- भिवंडीत शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यामुळे जवळपास १०७ लोकांना अन्नातून विषबाधा झाली
- विषबाधा झालेल्या रूग्णांना स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले
- महापालिकेने फेमस शोरमा हॉटेलवर त्वरित कारवाई करत तिथे बुलडोझर चालवला
भूपेंद्र आंबवणे
चिकन शोरमा,पिझ्झा खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची घटना भिवंडीत झाली होती. यातून जवळपास 107 जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या रूग्णांना स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची शनिवारी दुपारी महापौर नारायण चौधरी आणि आमदार महेश चौघुले यांनी भेट घेतली. शिवाय त्यांची विचारपूस केली. शिवाय त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत का याची ही माहिती घेतली. त्यानंतर मात्र मोठी कारवाई संबंधी फेमस शोरमा हॉटेलवर करण्यात आली. ही कारवाई महापालिकेने केली आहे.
महापौरांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी रुग्णांची भेट घेतल्यानंतर काही तासात या फेमस शोरमा हॉटेलवर बुलडोझर चालवला. अन्न विषबाधेला कारणीभूत ठरलेलं हे हॉटेल काही क्षणात जमिनदोस्त झालं. या कारवाई वेळी संबंधी हॉटेल परिसरात मोठी गर्दी झाली होती. अन्न विषबाधा झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे असं महापौर यावेळी म्हणाले. शिवाय आपण केलेल्या कारवाईचे ही त्यांनी समर्थन केले आहे.
या विषबाधेमुळे सुदैवाने कोणाचा जीव गेला नाही.फेमस शोरमा या ठिकाणी दररोज हजारो नागरिक जातात. मग चालकाने सुद्धा खबरदारी घेण्याची गरज होती. पैसे कमावण्यासाठी काही ही करण्याच्या थराला हे जात आहेत.त्यामुळे नागरिकांनी घरातील अन्न खावे असा सल्ला देण्यात आला आहे. हॉटेल चालकाकडे कोणताही परवाना नसल्याची बाब समोर आल्याने त्यावर कारवाई करण्याचे तत्काळ निर्देश दिल्याचे महापौरांनी सांगितलं. त्यानंतर दुपारी दोन वाजता फेमस शोरमा या हॉटेल वर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुलडोझर चालवला.