राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई येथे अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त मंगेश माने यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर, येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, सचिव धीरज कुमार आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 11 ऑगस्ट ते 25 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून अन्न सुरक्षा अंतर्गत जनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी या तीन मुख्य घटकांवर भर दिला जाणार आहे. अन्न व्यवसायिकांनी कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गणपती, ईद, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या काळात मिठाई, मोदक, फराळ, प्रसाद या सारख्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीत काही अन्न व्यावसायिकांकडून अयोग्य किंवा भेसळयुक्त अन्न तयार व विक्री होण्याचा धोका असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळे, मिठाई उत्पादक, मोदक व फराळ तयार करणारे महिला बचत गट यांच्यासाठी अन्न स्वच्छतेवरील कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत तक्रारी असल्यास 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर कळवाव्यात, असे आवाहनही सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी केले आहे.