संजय तिवारी, नागपूर
बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. शिक्षण भरती घोटाळा प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड निलंबित होणार आणि सेवेतून बडतर्फ देखील होणार असा दावा भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात उघड झालेल्या शिक्षण विभागातील बोगस भरती प्रकरणात सखोल चौकशी करण्यासाठी विरोधी पक्षानी एसआयटी तर न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी वाढत असताना आता भाजप आमदारांनीच राज्य सरकारकडे या बोगस भरती प्रकरणामुळे राज्याची प्रतिमा मालीण होत असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि याची गांभीर्याने दखल घेतली जावी यासाठी पूर्वीच भाजप आमदार प्रवीण दटके, संदीप जोशी तर आता माजी मंत्री व विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी मागणी केली आहे.
शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. यात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड निलंबीत नव्हे तर सेवेतून बडतर्फ होतील. अनेक शाळा व संस्थाचालक यात गुंतले आहेत. यात मोठे जाळे निर्माण केले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी एसआयटी गठीत करून चौकशी व्हावी अशी मागणी फुके यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
शिक्षण उपसंचालक उल्हास नरळ यांना अटक होऊन आठ दिवस उलटले आहेत. परंतु त्यांचे निलंबन राज्य सरकारने केलेले नाही. तर गोंदिया जिल्ह्यात याचा मास्टरमाइंड असल्याचे बोलले जातं आहे. तर अनेक शिक्षण संस्थाची तक्रार पोलीस अधीक्षक यांना शपथपत्र सादर करून करण्यात आली आहे. परंतु अद्याप जिल्ह्यात गुन्हे नोंद झाले नाहीत. यात कुणाचा दबाव आहे, असा देखील सवाल उपस्थित होत आहे.