नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरातील नागरिकांना सध्या सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या साधारण सरी झाल्यावरही संपूर्ण परिसरातील वीज बराच काळ गायब होते आहे. विशेष म्हणजे, वीज पुरवठा खंडित होण्यामागे महावितरणचे रेड बॉक्स (विद्युत वितरण यंत्रणा) अचानक बंद होणे हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे.
महावितरणचं दुर्लक्ष
कोपरखैराणे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, दरवर्षी पावसाळा सुरू झाला की येथील वीजपुरवठा अनियमित होतो. मात्र यावर्षी परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. छोट्या पावसातही वीज गायब होते आणि कधी कधी सलग 24 तास किंवा त्याहून अधिक वेळेसाठी अंधारात काढावा लागतो.
बिल आम्ही वेळेवर भरतो, सेवा मात्र ठप्प
स्थानिक रहिवासी हे वेळेवर वीजबिल भरतात, तरीही त्यांना दर्जेदार सेवा मिळत नसल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी महावितरणच्या हेल्पलाईन क्रमांकावर वारंवार फोन करून देखील कोणतीही ठोस मदत मिळाल्याचे समजले नाही.
"महावितरणच्या हेल्पलाईनवर फोन केला की ‘काम सुरू आहे' एवढंच सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात तासानतास, दिवसभर वीज येत नाही. रुग्ण, विद्यार्थी, वयोवृद्ध आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक ठरते आहे," अशी भावना रहिवासी सागर देशमुख यांनी व्यक्त केली.
रेड बॉक्स म्हणजे अडचणीचा केंद्रबिंदू
कोपरखैराणे परिसरात अनेक ठिकाणी महावितरणचे 'रेड बॉक्स' (LT Distribution Boxes) वर्षभर योग्य देखभाल न झाल्याने पावसात बिघडतात. त्यामुळे शॉर्टसर्किट, स्पार्किंग, आणि अखेर वीजपुरवठा खंडित होतो. नागरिकांनी या बॉक्सच्या नियमित देखभालीची मागणी वारंवार केली होती, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या गंभीर समस्येवर कोणताही स्थानिक लोकप्रतिनिधी ठोस भूमिका घेताना दिसत नाही. नागरिक महापालिका, महावितरण आणि लोकप्रतिनिधींना विचारत आहेत की, “आम्ही कर भरतो, मग सेवा का नाही मिळत?”
रेड बॉक्सची तातडीने देखभाल करावी, खराब बॉक्स त्वरित बदलून नवे यंत्र बसवावे, हेल्पलाईनवर उत्तर देणारे कर्मचारी नेमावेत, वीज पुरवठ्याबाबत तातडीची यंत्रणा सक्रिय करावी, अशा मागण्या कोपरखैरणे येथील नागरिकांनी केल्या आहेत. नवी मुंबई कोपरखैराणेतील वीजपुरवठा प्रश्न हा केवळ तांत्रिक अपयश नसून, व्यवस्थेतील हलगर्जीपणा आहे. महावितरण आणि संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांचा रोष अधिक वाढू शकतो.