निनाद करमरकर, बदलापूर
मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात सोमवारची पहाट सर्वाधिक थंड ठरली होती. हा गारठा पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार असल्याची माहिती बदलापूरमधील हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात गारठा वाढला असून सोमवारी पहाटे बदलापूर शहरात 10.4 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूर शहरातील हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या खासगी स्वयंचलित हवामान केंद्रात ही नोंद केली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे बदलापूर शहरात आधी पोहोचत असून ते इकडून मुंबईच्या दिशेने वाहत जातात. त्यामुळे बदलापूर शहरात कमी तापमानाची नोंद होते आणि त्यापुढे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामार्गे मुंबईत हे तापमान वाढत जातं, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
त्यामुळे मुंबईत सोमवारी पहाटे 14 अंश तापमानाची नोंद झाली. आता हा गारवा पुढील काही दिवस कायम राहील आणि जानेवारी महिन्यात आणखी 2 ते 3 अंशांनी तापमान घसरून मुंबई-ठाण्यात एक आकडी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज मोडक यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा - "गांधी कुटुंबाने माझी कारकिर्द घडवली आणि बिघडवलीही", मणिशंकर अय्यर यांचं खळबळजनक वक्तव्य
अभिजीत मोडक यांनी बदलापूर शहरात त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर खासगी स्वयंचलित हवामान केंद्र बसवलं आहे. या माध्यमातून तापमान, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, पर्जन्यमान या सगळ्याची नोंद त्यांच्याकडे होत असते. मुंबई आणि उपनगरातील तापमान मोजण्यासाठी कुलाबा आणि सांताक्रुझ या भारतीय हवामान विभागाच्या वेधशाळांची आकडेवारी ग्राह्य धरली जाते.
नक्की वाचा - परभणी हिंसाचार प्रकरणातील आरोपीचा कोठडीत मृत्यू? पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण
मात्र या वेधशाळा त्या त्या भागातील तापमानाची नोंद घेत असून बदलापूर शहर हे मुंबईपासून 40 किलोमीटर दूर असल्यानं इथल्या तापमानाची नोंद मात्र अधिकृतरित्या होतच नाही. त्यामुळेच मोडक यांनी स्वयंचलित खासगी हवामान केंद्र बदलापुरात उभारलं असून त्याचा या भागातल्या आकडेवारीसाठी फायदा होतोय.