Dombivli News : ठाणे जिल्ह्यातील विशेषत: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय आणि धार्मिक वर्तुळातील एक अत्यंत मोठी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि शिवभक्तांसाठी अत्यंत संवेदनशील बनलेल्या मलंगगड मुक्तीच्या मुद्द्याला आता थेट मुख्यमंत्र्यांच्या जाहीर मंचावरून जाहीरपणे हात घालण्यात आला आहे.
वर्षानुवर्षे ज्या मलंगगड मुक्तीची लाखो हिंदू बांधव आणि शिवभक्त डोळे लावून वाट पाहत आहेत, तो प्रश्न आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. डोंबिवलीत आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडला असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ एक मिनिट मनावर घेतले, तर हा प्रश्न सुटू शकतो, असा मोठा दावा केल्याने आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकाच चर्चेला उधाण आले आहे.
(नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमधील 'तो' वाद आता थेट दिल्लीत! राहुल गांधी घेणार KDMC च्या कारवाईची दखल )
.... तर एका मिनिटात सुटणार प्रश्न
डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर मंदिराच्या जागेसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयानंतर मंदिर ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि इतर प्रमुख लोकप्रतिनिधींच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट मलंगगड मुक्तीचा मुख्य अजेंडा समोर आणला.
हा संपूर्ण ठाणे जिल्हा हिंदुत्ववादी विचारांचा असून महायुतीवर मनापासून प्रेम करणारा आहे, अशी आठवण करून देत चव्हाण म्हणाले की, जिल्ह्याचा कायापालट होत असतानाच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मलंगगडाचा विषय आता सुटलाच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ती राजकीय ताकद असून त्यांनी ठरवले तर हा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न अवघ्या एका मिनिटात निकाली निघू शकतो, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये उड्डाणपुलाचा वाद आणखी चिघळला! आंबेडकरांना का सोडावी लागली बैठक? वाचा Inside Story )
खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही मागणी
याच कार्यक्रमादरम्यान कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही पिंपळेश्वर मंदिराच्या जागेसाठी सर्वांनी दिलेल्या लढ्याचा अभिमान व्यक्त केला आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले. पुढे बोलताना त्यांनी केवळ पिंपळेश्वर मंदिरच नव्हे, तर अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर आणि खिडकाळी येथील महादेव मंदिर या सर्व देवस्थानांचा ट्रस्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास करण्यासाठी सरकारने सहकार्य करावे, अशी विनंती केली. याच सूर धरत खासदार शिंदे यांनीही, मलंगगडाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसल्याने त्यात राज्य सरकारने आता गांभीर्याने लक्ष घालून तो सोडवावा, अशी विनंती जाहीर मंचावरून मुख्यमंत्र्यांना केली.
महादेवाच्या भक्तांनी जागा वाचवली!
या सर्व मागण्यांवर बोलताना आणि पिंपळेश्वर मंदिराच्या जागेसाठी झालेल्या संघर्षाचा पट उलगडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा खुलासा केला. या जागेचा इतिहास सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा पोलीस आणि गुंड एकत्र आले होते.
पोलीस ही जागा हडपायला आले होते आणि गुंडही ही जागा हडपण्यासाठी सरसावले होते. परंतु, अशा कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीतही महादेवाचे खरे भक्त या सर्वांना पुरून उरले. भक्तांच्या त्या अभेद्य शक्तीमुळेच ही पवित्र जागा वाचली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मलंगगडाबाबत आणि इतर मंदिरांबाबत केलेल्या सर्व मागण्या मी मुख्यमंत्री म्हणून नक्कीच पूर्ण करेन, असे स्पष्ट आणि जाहीर आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.