Dombivli Thane Bus Service : डोंबिवलीकरांचा प्रवास आता सुसाट होणार असून केवळ 20 रुपयांत ठाणे गाठता येणार आहे. या बस सेवेच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आम्ही सर्व एकत्र आल्याने बऱ्याच लोकांना आता गुदगुल्या होणार, असा खोचक टोला चव्हाण यांनी लगावला आहे. त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
प्रवाशांना मोठा दिलासा
लोकल ट्रेनमधील तुडुंब गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे डोंबिवलीकरांचे हाल होतात. अनेकदा या गर्दीमुळे प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. ही जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी डोंबिवली ते ठाणे बस सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती.
अखेर या मागणीला यश आले असून बुधवारपासून ही सेवा अधिकृतपणे सुरू झाली आहे. स्वामीनारायण सर्कल ते ठाणे असा हा प्रवास असणार असून यासाठी प्रवाशांना केवळ 20 रुपये मोजावे लागणार आहेत.
( नक्की वाचा : Thane News: ठाणेकरांनो मोठी बातमी! कळवा, मुंब्रा ते बदलापूर; तुमच्या दारात येणार मेट्रो, वाचा सविस्तर )
भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या बस सेवेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने डोंबिवलीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. या बस सेवेचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना चव्हाण यांनी दीपेश म्हात्रे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. या सेवेमुळे ठाणे गाठणे आता अधिक सोपे आणि स्वस्त झाले असून डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोची नवी गुगली! आता स्टेशनमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बदलावी लागणार सवय )
रवींद्र चव्हाण यांचा राजकीय टोला कोणाला
कार्यक्रमादरम्यान बोलताना रवींद्र चव्हाण यांनी राजकारणावर भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आम्ही सर्व एकत्र आल्याने अनेकांना गुदगुल्या होणार आहेत, असे विधान त्यांनी केले. हे विधान त्यांनी नक्की कोणाला उद्देशून केले आहे, याबाबत आता कल्याण डोंबिवलीत जोरदार चर्चा सुरू आहे.