सूरज कसबे, प्रतिनिधी
Dehu Indrayani River : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची कर्मभूमी आणि लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देहूतील इंद्रायणी नदीचा घाट सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे.पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना या अस्वच्छतेमुळे मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात वारकरी संप्रदायातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जलपर्णी आणि दुर्गंधीचा विळखा
इंद्रायणी नदीच्या पात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साचली असून प्लास्टिक कचऱ्याचे ढिग ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत.कचरा आणि सांडपाण्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला असून नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे.घाटावर पसरलेल्या उग्र दर्पामुळे भाविकांना तिथे थांबणेही कठीण झाले आहे.दररोज दर्शनासाठी येणारे हजारो वारकरी नदीच्या पवित्र पात्रात उतरत नाहीत. अनेक भाविकांना स्नानाविनाच माघारी फिरावे लागत आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात कार खरेदी करताना सावध राहा, ग्राहकांची होतेय फसवणूक; पोलिसांनी चाकणमध्ये टोळीला पकडलं
प्रशासकीय खर्चावर प्रश्नचिन्ह
दरवर्षी प्रशासनाकडून इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी आणि जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो.मात्र,प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती जैसे थे असल्याने हा पैसा नेमका जातो कुठे?असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि भाविक उपस्थित करत आहेत.कोट्यवधींच्या निधीनंतरही नदीचा श्वास का गुदमरत आहे,याची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नक्की वाचा >> Nanded News: नांदेड शहरात खळबळ! 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांची हत्या..पोलिसांचा मुख्य आरोपीवर गोळीबार अन्..
इंद्रायणीच्या या दुरवस्थेमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. स्थानिक नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाने तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्र स्वच्छ न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या देहूमध्ये ही स्थिती असणे दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे.आता या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन डोळेझाक करणार की ठोस कृती आराखडा राबवून इंद्रायणीला तिचे मूळ स्वरूप परत मिळवून देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.