अविनाश पवार, प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दरड कोसळल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आजही त्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. श्रावण सुरू झाला आहे, त्यामुळे शनिवार-रविवारी आवर्जुन पावसाळी सहलीसाठी जातात. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी पुणे-मुंबई मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मात्र आज खेड शिवापुर टोल नाक्याजवळ तब्बल दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. पर्यटकांची वाढलेली संख्या आणि महामार्गाची दुरवस्था यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-बंगळुरु महामार्गावरील (Mumbai-Bangalore Highway) वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज खेड शिवापुर टोल नाक्याजवळ तब्बल दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये महाबळेश्वर, वाई, सातारा या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आणि त्यामुळे या महामार्गावर गर्दी होणं नित्याचंच झालं आहे.
नक्की वाचा - Pune Dam Water Level: खडकवासला धरणक्षेत्र 85. 20 टक्के भरलं! 'या' दोन धरणांमधून विसर्ग सुरु, नागरिकांना सतर्कत
मात्र, यामागचं आणखी एक गंभीर कारण म्हणजे या महामार्गाची दुरवस्था. अनेक ठिकाणी अपूर्ण कामं, खराब रस्ते, आणि रस्त्यावरील धोकादायक खड्डे यामुळे वाहतूक आणखी संथ होते. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाने वेळोवेळी आयआरबी कंपनीला दंड ठोठावले, परंतु अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही. याचा परिणाम म्हणजे रोज प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.