राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri Wild Animal Bison Video Viral : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सध्या गव्यांच्या वाढत्या मुक्त संचारामुळे शेतकरी वर्गामध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द परिसरात गव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ऐन भातलावणीच्या हंगामात उभ्या पिकांची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गव्यांच्या कळपाचा भयानक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कुंभारखाणी खुर्द येथील भोजनेवाडी,गडगेवाडी आणि खडकेवाडी या तीन वाड्यांमध्ये गव्यांच्या कळपाने हैदोस घातला आहे.सध्या परिसरात भातलावणीची कामे जोरात सुरू आहेत.शेतकरी मोठ्या मेहनतीने शेतात भात रोपे लावत आहेत.मात्र रात्रीच्या वेळी शेतात घुसून गवे ही पिके फस्त करत आहेत.या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.
"आम्ही पिके लावायची की गव्यांपासून संरक्षण करायचं?"
स्थानिक शेतकऱ्यांनी या गंभीर समस्येकडे वन विभाग आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. "आम्ही पिके जगवायची की गव्यांपासून संरक्षण करायचे?"असा सवाल हवालदिल झालेले शेतकरी करत आहेत.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
गव्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी वन विभागाने त्वरित पावले उचलावीत.शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.तसेच गव्यांनी केलेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने योग्य आर्थिक भरपाई देण्यात यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..