Chhatrapati Sambhajinagar News : कोट्यवधी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते पैठण या राष्ट्रीय महामार्गाबाबत एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. या महामार्गाचे काम अजून पूर्णही झालेले नाही आणि उद्घाटनापूर्वीच नव्याने बांधलेल्या रस्त्याचा मोठा भाग अचानक खचला. एका पुलाच्या बाजूला असलेली माती आधी सरकली आणि पाहता पाहता सिमेंटचा मोठा भराव थेट खाली कोसळला. रस्ता खचल्याचा हा भीतीदायक प्रकार स्थानिक नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नक्की काय घडले?
रस्ता खचल्याच्या या प्रकारानंतर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यावर अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, ज्या ठिकाणी हा रस्ता खचला आहे, तिथे छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनीच्या वॉलचे काम सुरू आहे.
( नक्की वाचा : NCMC Card: 1 ऑगस्टची मुदत हुकली तरी काळजी नको! एसटीच्या 'या' निर्णयामुळे लाखो प्रवाशांची अडचण दूर )
पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी उशीर केला. त्यातच झालेल्या मुसळधार पावसामुळे माती सरकून हा रस्ता खचल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. दुसरीकडे, या आरोपांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही.
रस्ता खचल्यामुळे केवळ वाहतुकीचाच खोळंबा झाला नाही, तर लगतच असलेली बिडकीन ग्रामपंचायतीची मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनी थेट फुटली. यामुळे बिडकीन गावाचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या परस्पर सहकार्याचा अभाव आणि निष्काळजीपणामुळे अखेर सामान्य नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: 'त्या'रात्री काय घडलं?डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील अहवाल सादर, रमेश म्हात्रेचं काय होणार? )
कोर्टाची नजर असलेल्या योजनेचा संथ कारभार
विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते पैठण महामार्ग आणि शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम एकाच वेळी सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजनेचे काम रखडल्यामुळे रस्ता तयार करण्यात अडचणी येत आहेत, तर काही ठिकाणी आधीच तयार केलेला रस्ता या पाईपलाईनसाठी पुन्हा फोडण्याची वेळ आली आहे.
संभाजीनगरच्या या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेची गांभीर्याने दखल स्वतः मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली आहे. खंडपीठ स्वतः या संपूर्ण कामावर लक्ष ठेवून असतानाही हा असा भोंगळ कारभार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.