संजय तिवारी, नागपूर
Nagpur News : रविवार छान जावा याकरिता एका कुटुंबाने वॉटर पार्कची वाट धरली. मात्र त्यांची ही सफर अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक ठरली. या पर्यटक कुटुंबीयांशी वॉटर पार्क च्या बाऊन्सर्स सोबत झालेल्या एका किरकोळ वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले.बाऊन्सर्सनी त्यांना जबर मारहाण तर केलीच शिवाय अवैधरित्या डांबून देखील ठेवले.
नागपूर जिल्ह्यातील द्वारका वॉटर पार्कमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पर्यटन स्थळांवर सुरक्षारक्षक म्हणून चक्क एखाद्या बार रेस्टॉरंटमध्ये असतात तसे बाऊन्सर्स ठेवण्याचा जो ट्रेंड आला आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याशिवाय या तथाकथित बाऊन्सर्सना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा दर्जा देखील दाखवून दिला आहे.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचा 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार; नागरिकांनी दिला चोप)
पोलिसांकडून दुर्लक्ष
नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील वाकी येथील द्वारका वॉटर पार्कमध्ये फिरायला गेलेल्या कामठी येथील एका कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर तब्बल दीड तास त्यांना एका रूममध्ये डांबून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे खापा पोलीस आणि डायल 112 यांच्याशी संपर्क केल्यावरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. खापा पोलिसांनी यात टाळाटाळ केल्याने, पीडितांना धक्काच बसला.
पोलीस अधीक्षकांना फोन
रेव्ह पार्टी प्रकरण, फायरिंग करून हत्या आणि आता द्वारका वॉटर पार्क येथे एका कुटुंबाला मारहाण या प्रकरणामुळे खापा पोलीस स्टेशन सलग तीन दिवसापासून चर्चेत आहे. अशा वेळी, काहीही मदत न मिळाल्यामुळे पीडित परिवाराने मित्रांकडून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा नंबर मिळवून त्यांना मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर खापा पोलिसांनी पीडितांना मदत केली.
(नक्की वाचा- Chandrapur News: वादानंतर संताप अनावर; बायकोने केली नवऱ्याची गळा आवळून हत्या)
कामठी येथील साक्षी घरोटे, सोनाली शिंदे, विवेक शिंदे, पवन शिंदे, मयूर घाटोळे यासह अन्य दोन जण असे सात जण पार्कमध्ये गेले होते. सायंकाळी पार्क बंद होत असताना एका सुरक्षा रक्षकासोबत किरकोळ झालेल्या वादानंतर कुटुंबीयांना मारहाण करून खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला. या सर्व गदारोळात बेशुद्ध असलेल्या दोन महिलांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सावनेर तालुक्याच्या पाटण सावंगी येथे पोलिसात तक्रार दाखल झाली असली तरी कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल होत आहे ते समोर आलेले नाही.