- होळीच्या सणासाठी मुंबईतून मोठ्या संख्येने लोक कोकणात जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग वापरत आहेत
- महामार्गावर अजूनही रस्त्याचे काम सुरू असल्याने माणगाव परिसरात वाहतूक कोंडी
- इंदापूर ते कोलाड या पट्ट्यात महामार्गाचे काम रखडल्याने वाहतूक हळूहळू
प्रसाद पाटील
Mumbai Goa Highway: होळीच्या सणासाठी कोकणात मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी रवाना होत आहे. कोकण रेल्वे प्रमाणेच रस्त्याने ही बरेच जण गाव गाठत आहेत. होळी दोन मार्चला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चाकरमानी कोकणात निघाले आहे. आज रविवारी त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. बरेचशे लोक रविवारी गावाकडे निघाले आहे. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी अजून ही रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तीन-तीन किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
मुंबई पनवेलमार्गे अनेक जण कोकणात मुंबई गोवा महामार्गे गावी जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे रायगडमध्ये मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंदापूर- कोलाड या ठिकाणी महामार्गाचे काम अजून ही रखडलेले आहे. त्याचा फटका या वाहतूकीला बसत आहे. त्यामुळे कोलाड ते इंदापूर या पट्ट्यात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. वाहने हळूहळू पुढे मार्ग काढत आहेत.
पुढे इंदापूरला आल्यानंतर माणगावपर्यंत जाण्यासाठी ही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. माणगाव बाजारपेठ ते पुढे लोणेर फाट्यापर्यंत रस्त्याचं काही प्रमाणात काम सुरू आहे. त्यामुळे इथं जवळपास तीन किलोमिटरपर्यंच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. वाहतूक पोलीस ही आता रस्त्यावर उतरले आहेत. वाहतूक कोंडी फोडताना त्यांची कसरत होत आहे. मुंबईहून कोकणात जाणारी वाहतूक त्यामुळे खोळंबली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग जरी मोकळा असला तरी विरुद्ध दिशेनेही वाहनं अनेकांनी घुसवली आहे. त्याच फटका वाहतूकीला बसला आहे. त्यामुळे पुढच्या प्रवासाला ही विलंब होत आहे.
कोकणात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती प्रमाणे शिमग्याला मोठ्या प्रमाणात कोकणवासी कोकणात गावाला जातात. त्यामुळे दरवर्षी या मुंबई गोवा महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. हा महामार्ग लवकर पूर्ण करावा अशी मागणी नेहमीच केली जाते. पण अजून ही त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्याचा फटका मात्र प्रवाशांना बसतो. पोलादपूर पासून पुढे रस्ता चांगला आहे. पण इंदापूर आणि माणगावमधील काही पॅच हे शिल्लक आहेत. त्याचा त्रास प्रवाशांना आता होत आहे.