इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका आखाती देशांना बसला आहे. त्यात दुबई, बेहरीन, सौदी अरेबिया, कुवेत या देशाचा समावेश आहे. या पैकी दुबई भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात. शिवाय काही व्यावसायिक गोष्टींसाठी ही दुबई व्यापारी जाता. विद्यार्थ्यांच्या स्टडी टुर ही दुबईत आयोजित केल्या जातात. युद्ध सुरू होण्या आधी दुबईत मोठ्या संख्येने भारतीय गेले होते. त्यात पुण्यातील नागरिकांची संख्या ही मोठी होती. युद्ध सुरू झाल्यानंतर हे सर्व जण कोणी दुबईत तर कुणी अबूधाबीमध्ये अडकले होते. त्यांनी भारतात परत येण्यासाठी सरकारकडे विनंती केली होती. त्यानुसार टप्प्या टप्प्याने पुणेकर परत येत आहेत.
दुबई येथे गेलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांपैकी आतापर्यंत 128 नागरिक सुखरूप पुण्यात परतले आहेत. याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण 246 नागरिक दुबई येथे गेले होते. त्यापैकी काल म्हणजे गुरूवारी 111 नागरिक पुण्यात परतले होते. आज आणखी 17 नागरिक पुण्यात पोहोचले असून आतापर्यंत एकूण 128 नागरिक सुखरूप परतले आहेत.दरम्यान, 28 नागरिकांच्या विमान प्रवासाचे वेळापत्रक (फ्लाइट) पुनर्नियोजित करण्यात आले असून त्यांना लवकरच भारतात परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
उर्वरित 90 नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही. त्याबाबत संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक समन्वय सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. दुबई येथे अडकलेल्या सर्व नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. युद्धामुळे दुबईत अडकलेल्या भारतीय नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यांना लवकरात लवकर भारतात परत यायचे आहे. पण तिथली परिस्थिती बिकट आहे. त्यातून सरकार मार्ग काढत आहे. सर्व नागरिकांना सुरक्षित भारतात आणण्याला प्राधान्य दिलं जात आहे.