मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon News : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असून जळगाव जिल्ह्यातही गेल्या दोन ते तीन दिवसापासून थंडीची लाट पसरली आहे. जळगाव जिल्ह्याचे तापमान गेल्या दोन दिवसापूर्वी 10 अंशाखाली आले आहे. त्यातच पुन्हा 2.7 अंशाने तापमानात घट होऊन जिल्ह्याचा पारा 7.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली असून जनजीवनावरही वाढत्या थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे
2002 मध्ये नोव्हेंबर महिन्यात 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता 2025 मध्ये नोव्हेंबर महिन्यात 7.1 अंश सेल्सिअस सर्वाधिक कमी तापमानाची ममुराबाद वेधशाळेत नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे थंडीने 23 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
यंदा रेकॉर्ड ब्रेक थंडी
उत्तर महाराष्ट्रात यावर्षी थंडीने कहर केला असून धुळे नंदुरबार नाशिक व जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तरेकडील शीतलहरी वाहू लागल्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून पुढील तीन ते चार दिवस जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. थंडीच्या लाटेमुळे रात्रीच्या तापमानासोबतच दिवसाच्या तापमानातही घट झाली असून त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांकडून वर्तवले जात आहे.
नक्की वाचा - Pune News : पुण्यात भीतीचं वातावरण, रात्री फिरणं झालंय धोक्याचं; पहाटे 3 वाजताचा धक्कादायक Video आला समोर
हवामान कोरडे राहिल्यास अजूनही पारा घसरणार
ऑक्टोबर महिन्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात वाढ झालेली होती. मात्र नोव्हेंबर महिना सुरू होतात तापमानात सतत घट होत असून कोरडे हवामान असल्याने उत्तरेकडील शीत लहरींमुळे ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्याचे तापमान 14 अंशाने घटले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. मात्र पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची दाट शक्यता असून त्यामुळे कोरडे हवामान कायम राहणार असल्याने थंडीचा कडाका हा अजूनही वाढण्याची शक्यता हवान तज्ञांनी वर्तवली आहे..
जळगावमध्ये सर्वाधिक थंडी का पडते?
उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याची नोंद होते. उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्याचं तापमान 48 अंश सेल्सिअसपेक्षा पोहोचलं आहे. मात्र यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हवामान कोरडं असल्याने हिमालयात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे शीतलहरीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावर्षी जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक थंडी पडली आहे.