- टिटवाळा आणि बल्ल्यानी भागात मुसळधार पाऊस होत आहे
- टिटवाळा आणि बल्ल्यानी परिसरात रस्त्याच्या मधोमध मोठा भगदाड पडलं आहे
- शिवसेना (शिंदे गट)चे पदाधिकारी मयूर पाटील यांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे
अमजद खान
गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोरा वाढला आहे. त्यात कल्याण डोंबिवलीला ही पावसाने झोडपून काढले आहे. इकडे कल्याण आणि डोंबिवलीत पावसामुळे एकच तारांबळ उडाली आहे. जागोजागी पाणी साचले आहे. अनेक घरात ही पाणी शिरल्याचं समोर आलं आहे. तर रस्ते ही जलमय झाले आहेत. असं असताना केडीएमसीचाच भाग असलेल्या टिटवाळा आणि बल्ल्यानी या भागात ही पावसाने वाईट स्थिती झाली आहे. त्यामुळे इथं राहणाऱ्या लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहेत. प्रशासनाने एकाबाजूला असलेल्या या टिटवाळा आणि बल्ल्यानीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कल्याण तालुक्यातील टिटवाळा-बल्ल्यानी मार्गावर रस्त्याला मोठं भगदाड पडल्याचं समोर आलं आहे. रस्त्याच्या मधोमध हे भलं मोठं भगदाड पडल्याने मोठा अपघात होवू शकतो. संपूर्ण गाडी या खड्ड्यात जावू शकते येवढं मोठं हे भगदाड आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण आहे. याच मार्गाने टिटवाळा आणि बल्ल्यानीचे लोक येत असतात. पण या घटनेमुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे बाब समोर येताच तिथे मोठ्या प्रमाणात गावकरी जमले होते.
या घटनेनंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मयूर पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती व आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी यापूर्वीच महापालिका अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असं ही मयूर पाटील यांनी यावेळी सांगितलं.
रस्त्याला भगदाड पडल्यानंतर रस्त्याचं काम नक्की कशा पद्धतीने केलं होतं याची चर्चा आता रंगली आहे. कल्याण डोंबिवलीकडे जेवढं लक्ष दिलं जातं तेवढ लक्ष टिटवाळा भागाकडे दिलं जात नाही असा आरोप आता होत आहे. दरम्यान मोठी दुर्घटना नको असेल तर हे भगदाड तातडीने भरा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. आता तात्पूरत्या स्वरूपात गावकऱ्यांनीच इथं उपाय केला आहे. पण तिथे जर कुणी नसेल किंवा अनोळखी वाहन, व्यक्ती या मार्गाने आला तर मोठी दुर्घटना होवू शकते असं स्थानिकांनी म्हटलं आहे.