अमजद खान, प्रतिनिधी
Durgadi Fort Kalyan :कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत आज पहाटे (बुधवार, 4 जून) कोसळली. विशेष म्हणजे या किल्ल्याच्या कामासाठी पर्यटन विभागाकडून 10 कोटींचा निधी मंजूर झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि कल्याणचे खासदर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर पहिल्याच पावसात ही घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी तातडीने किल्ल्याला भेट दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले शिवसेना आमदार?
विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितलं की, किल्ले दुर्गाडी हा शिवसैनिकांच्या आस्थेचा विषय आहे. ही भिंत पडल्यावर कंत्राटदाराचा पत्ता नाही. त्याला संध्याकाळपर्यंत घटनास्थळी बोलविले आहे. तो आला नाही तर उद्या त्याची वरातच काढणार, असा इशारा त्यांनी दिला.
आज पहाटे किल्ले दुर्गाडीची भिंत पडली. आम्ही पाहणीसाठी उपस्थित असताना किल्ले दुर्गाडीच्या आणखीन काही भाग कोसळला. ही घटना तर आमच्या डोळ्या देखत घडली. किल्ल्याचे काम करीत असताना त्या चुना, गुळ, मेथी याचा वापर करुन त्याचे बांधकाम करणे आवश्यक आहे. जे शिवकाळात केले जात होते. त्याच साहित्याचा वापर केला पाहिजे. या पूर्वीच्या कंत्राटदाराकडून ते काम योग्य प्रकारे केले जात होते.
( नक्की वाचा : 'पहिलीपासून हिंदी... सरकारचा डाव नाही ना?' राज ठाकरेंचा पत्र लिहून निर्वाणीचा इशारा )
आता पटेल हे कंत्राटदार आहेत. त्याच्याकडून काम योग्य प्रकारे केले जात नसल्याने संरक्षक भिंत कोसळली. त्याठिकाणी त्याचे कामगार आहे. घटना घडल्यावर कंत्राटदार पटेल यांना याठिकाणी येण्याची गरज भासत नाही. किल्ले दुर्गाडीच्या कामासाठी पर्यटन विभागाकडून निधी मंजूर झाला होता. ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला गेला. या दोन्ही खात्याच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला. त्यांच्याकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. किल्ले दुर्गाडीच्या कामात हयगय करणाऱ्या कंत्राटदाराची हयगय केली जाणार नाही. कंत्राटदार आला नाही तर त्यांची शिवसेना स्टाईलने वरात काढली जाईल असा इशारा आमदार भोईर यांनी दिला आहे.