- केडीएमसी महासभेत गेल्या अनेक वर्षांपासून राडा आणि वादविवादांचा इतिहास आहे
- सोमवारी झालेल्या पहिल्या महासभेत शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शुल्लक कारणावरुन वाद झाला होता
- काही नगरसेवकांनी पोलिस बंदोबस्तावर प्रश्न उपस्थित केले तरीही प्रशासनाने पुढील महासभांसाठी बंदोबस्त कायम ठेवलाय
अमजद खान
केडीएमसी महासभे दरम्यान पोलीस बंदोबस्तावरुन काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. महासभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राड्याचा इतिहास राहिला आहे. एवढेच नाही तर सोमवारी आयोजित महासभेत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये एक शुल्लक कारणावरून वाद होता होता वाचला. ही परिस्थिती बघता पोलिस बंदोबस्त गरजेचा आहे अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकारी आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाची पाहणी केली. 20 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत कोणाला गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाईल. मात्र पोलिस बंदोबस्त राहणारच अशी भूमिका केडीएमसी प्रशासनाने घेतली आहे.
काही ना काही कारणावरुन केडीएमसी चर्चेत असते. भ्रष्टाचाराचा विषय असो. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असो किंवा महापालिकेतील नगरसेवकांचा विषय असो. गेल्या पाच वर्षापासून प्रशासकीय राजवट होती. आता निवडणूका पार पडल्या आहेत. आत्ता नगरसेवक निवडून आले आहेत. पहिली महासभा सोमवारी पार पडली. या महासभे दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला गेला होता. काही नगरसेवकांची तपासणी करण्यात आली. यावरुन नगरसेवक मल्लेश शेट्टी, सचिन पोटे यांनी काही प्रश्न महासभेत उपस्थित केले होते.
आम्ही गुंड आहोत का? एअरपोर्टला जशी सुरक्षा असते तशी सुरक्षा लावली आहे? असा प्रश्न उपस्थित केला. प्रश्न असा आहे की, पोलिस बंदोबस्त असला तरी त्याचा त्रास काय? गेल्या 16 वर्षापासून केडीएमसीचा इतिहास राहिला आहे. त्यात अनेत वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे महापालिकेची बदनामी देखील झाली आहे. नगरसेवक महासभेत आपसात भिडले आहेत. त्यांचे समर्थक महापालिका मुख्यालयात भिडले आहेत. तत्कालीन शिवसेना नगरसेवक रवी पाटील आणि मल्लेश शेट्टी यांच्यात राडा झाला होता. नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दिपेश म्हात्रे यांच्यात वादानंतर राडा झाला होता. काही नगरसेवकांचे समर्थक मुख्यालया बाहेर भिडले होते. एकावेळी डीसीपी संजय शिंदे यांनी महासभे दरम्यान येणाऱ्या नगरसेवकांच्या गाड्या तपासणीचे आदेश दिले होते.
या दरम्यान मोठ्या प्रमाणात हॉकी स्टीक, दांडके, हाणामारीच्या हत्याराचा वापर केला जातो, ते सगळे सापडले होते. सहा वर्षानंतर नगरसेवक परतले आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस आणि महापालिका काळजी घेत आहे. त्याकरीता पोलिस बंदोबस्त लावला जातो. हा बंदोबस्त पुढेही ठेवला जाणार आहे. २० मार्चला होणाऱ्या महासभेत कशा स्वरुपाचा पोलिस बंदोबस्त राहवा यासाठी केडीएमसी मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल आणि कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांची बैठक पाडली. यानंतर केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, एसीपी कल्याणजी घेते आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांनी मुख्यालयाची पाहणी केली. गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. पोलिस बंदोबस्त राहणार असल्याने महासभेत नगरसेवक काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.