- कल्याणमधील आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ऋषिकेश पवार यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे
- मृत्यूच्या वेळी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात चार तासांचा विलंब झाला
- उपचारासाठी रुग्णवाहिकेऐवजी जेल सुप्रिडेंटच्या खाजगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आलं
अमजद खान
एका कैद्याचा कारागृहातच संशयास्पद मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमधील आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ऋषिकेश पवार असे मृत कैद्याचे नाव असून, जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा जीव गेल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कल्याणचे आधारवाडी जेल हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता तर कैद्याचाच मृत्यू जेलमध्ये झाला आहे.
या कैद्याच्या उपचाराला 4 तासांचा विलंब झाल्याचा आरोप केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पवार हा एका गुन्ह्यात आधारवाडी जेलमध्ये कोठडीत होता. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता त्याच्या छातीत दुखू लागले होते. मात्र, त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी तब्बल 4 तास उशिराने, म्हणजेच रात्री 9 वाजेच्या सुमारास उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात हलवण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट
या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, ऋषिकेशला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला नाही. त्याला जेल सुप्रिडेंटच्या खाजगी बोलेरो गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले. 5 वाजता त्रास सुरू होऊनही 9 वाजेपर्यंत जेल प्रशासन काय करत होते? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी विचारला आहे. त्यामुळे जेल प्रशासनाच्या कारभाराबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर आता जेल प्रशासन काय स्पष्टीकरण देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या गोष्टीमुळे पुन्हा एकदा आधारवाडी जेल चर्चेत आले आहे.
ऋषिकेशच्या मृत्यूची बातमी समजताच संतप्त नातेवाईकांनी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात धाव घेतली. तिथे नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातला. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पवार कुटुंबाने दिला आहे. या प्रकरणी आता सखोल चौकशीची मागणी होत आहे. त्यावर जेल प्रशासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात जेल प्रशासनाचा हलगर्जी पणा आहे की नाही हे चौकशी नंतरच स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world