Dombivli News: कल्याण आणि ठाणे जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. या मार्गावरील मानपाडा जंक्शन परिसरात मेट्रोचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहन चालकांसह शाळकरी विद्यार्थी आणि पालकांना दररोज प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे कमालीची आक्रमक झाली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या भागातील परिस्थिती आणखीनच बिकट झाली असून, चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या स्कूल बस आणि खासगी वाहने तासनतास या कोंडीत अडकून पडत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
वाहनांच्या लांबच लांब रांगा
या भागातील वाहतुकीबाबत वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार रुणवाल सिटी ते मानपाडा, सोनारपाडा ते मानपाडा आणि संघवी गार्डन ते मानपाडा या प्रमुख मार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत आहेत. मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून, त्यातच योग्य नियोजनाचा अभाव असल्याने हा संपूर्ण परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे.
( नक्की वाचा : पुन्हा नोटाबंदी होणार की काय? 10, 20, 50, 100 रुपयांच्या जुन्या नोटांबाबत बँक ऑफ महाष्ट्रानं दिली मोठी माहिती )
मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी या परिस्थितीवरून प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मेट्रो प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या काळात योग्य नियोजन करून काम वेगाने पूर्ण करणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नसल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.
बेशिस्त वाहन चालक आणि पोलिसांवरील ताण
या अवाढव्य वाहतूक कोंडीमुळे स्थानिक वाहतूक पोलिसांवरही प्रचंड ताण येत आहे. एका बाजूला रस्त्याची दुरवस्था आणि मेट्रोचे संथ काम असताना, दुसऱ्या बाजूला बेशिस्त वाहन चालकांमुळे या समस्येत आणखी भर पडत आहे. नो-एंट्री असलेल्या मार्गांवरून बेकायदेशीरपणे वाहने घुसखोरी करतात. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे मानपाडा जंक्शनवरील कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत असल्याचे हर्षद पाटील यांनी म्हटले आहे. यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींचे या रोजच्या नरकयातनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: टोमॅटो देण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीला घरात ओढून अत्याचार; कल्याणामध्ये विकृतीचा कळस )
प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम
कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील ही जीवघेणी कोंडी फोडण्यासाठी मनसेने आता थेट एमएमआरडीए आणि स्थानिक प्रशासनाला जाहीर इशारा दिला आहे. येत्या 8 दिवसांत मानपाडा जंक्शन येथील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली नाही, तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर काय तातडीच्या उपाययोजना करतात, याकडे कल्याण आणि डोंबिवलीकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.