Kalyan News: मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसमधील (Kushinagar Express) भीषण गर्दीमुळे एका 32 वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाळीनिमित्त लांब पल्ल्याच्या रेल्वेला होणारी प्रचंड गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचे या घटनेने सिद्ध झाले आहे.
कसा झाला अपघात?
शादाब खान (Shadab Khan) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील फैजाबादचा रहिवासी असून, मुंबईतील नागपाडा (Nagpada) परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. शादाबने काल रात्री (गुरुवार, 9 ऑक्टोबर) मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून आपल्या गावी जाण्यासाठी कुशीनगर एक्स्प्रेस पकडली होती.
ही एक्स्प्रेस शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान (Shahad-Ambivli) रात्री सुमारे 1:30 वाजताच्या सुमारास पोहोचली. रेल्वेमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे झालेल्या धक्क्यामुळे किंवा तोल गेल्याने शादाब खान चालत्या गाडीतून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ )
घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी (Kalyan Railway Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शादाबचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात (Rukminibai Hospital) पाठवण्यात आला आहे.
रेल्वे पोलिसांनी त्याच्या मृत्यूची माहिती उत्तर प्रदेशातील त्याच्या नातेवाईकांना दिली आहे. शादाबच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या हॉटेल मालकानेही रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घेतली. केवळ गर्दीमुळे शादाबला आपला जीव गमवावा लागला असल्याने रेल्वे प्रवासी संघटनांकडून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी एक प्रवासी जखमी
दरम्यान, याच रात्रीच्या सुमारास आंबिवलीनजीक आणखी एक प्रवासी चालत्या रेल्वेतून पडून जखमी झाल्याची माहिती आहे. आबिद जाफर शेख (Abid Zafar Shaikh) असे त्याचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आबिद नेमका कोणत्या रेल्वेतून आणि कुठून प्रवास करत होता, याबाबतची माहिती रेल्वे पोलीस घेत आहेत.
या दोन्ही घटनांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील (Long-distance trains) प्रचंड गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने विशेष उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.