Mahabaleshwar News : महाबळेश्वरचा रस्ता जोखमीचा? तापोळ्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प, पर्यटकांचा मनस्ताप 

सुट्टीत महाबळेश्वरचा जाण्याचा प्लान करीत असाल तर आधी ही बातमी वाचा..

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल तपासे, प्रतिनिधी
 
Mahabaleshwar News : पावसाळ्यात महाबळेश्वरचं सौंदर्य अधिक खुलून येतं. त्यामुळे पावसाळ्यात महाबळेश्वर, पाचगणी आणि साताऱ्या जिल्ह्यातील तापोळ्याची वाट धरतात. मात्र सध्या साताऱ्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी अनेक ठिकाणी दरड कोसळणे आणि रस्ता खचण्यासारख्या घटना वारंवार घडत आहेत.  महाबळेश्वर इतकाच तापोळ्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. महाबळेश्वरपासून ५० किलोमीटर अंतरावर तापोळा आहे. मात्र सध्या तरी तापोळ्याचा रस्ता अवघड झाला आहे. 

महाबळेश्वरला जाताना सावध राहा...

सातारा–महाबळेश्वर महामार्गावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात कोसळलेल्या महाकाय दरडीमुळे तब्बल 24 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. रस्त्यावर दगड आणि मातीचा मोठा ढिगारा साचल्याने हा महत्त्वाचा घाटमार्ग बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. आज २८ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासन आणि यंत्रणांनी युद्धपातळीवर दरड हटविण्याचं काम हाती घेतलं. जेसीबीसह अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर दरड पूर्णपणे हटविण्यात यश आले आहे. दरड हटविल्यानंतर सातारा–महाबळेश्वर महामार्गावरील वाहतूक नुकतीच पूर्ववत सुरू करण्यात आली असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता घाट परिसरात सतर्कता बाळगण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

नक्की वाचा -  महाबळेश्वरमध्ये स्थानिकांसह पर्यटकांमध्येही घबराट; मार्केटमध्ये फिरताना अलर्ट राहा!


महाबळेश्वर तापोळा रस्ता परत बंद  

महाबळेश्वर-तापोळा रस्ता गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास तीन वेळा खचला असून महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्याला तात्पुरत्या स्वरूपाची नाही तर तर अगदी भक्कमपणे रस्ता दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तापोळा भागात जाणाऱ्या सर्व नागरिकांना व प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून पुन्हा एकदा हा रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आपत्कालिन परिस्थितीत महाबळेश्वर शहरामध्ये येणारा हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळे महाबळेश्वर नगरपालिकेने घटनेचे गांभीर्य ओळखून व डोळे उघडे ठेऊन या रस्त्याची योग्य बांधणी करणं आवश्यक आहे, असं मत या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.


Topics mentioned in this article