Maharashtra Census 2027 Begins Today: महाराष्ट्रात आजपासून बहुप्रतिक्षित 'जनगणना 2027' प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. विशेष म्हणजे, ही भारताची पहिली 'डिजिटल जनगणना' असून स्मार्टफोनच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी (महाराष्ट्र) निरुपमा डांगे यांनी जनतेला या प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जनगणनेचे दोन टप्पे
जनगणना प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांत राबवली जाणार आहे.
- पहिला टप्पा (1 मे - 14 जून 2026): या टप्प्यात घरांची यादी आणि घराच्या स्थितीबाबतची माहिती घेतली जाईल.
- दुसरा टप्पा (फेब्रुवारी 2027): या काळात लोकसंख्या गणना आणि लोकसंख्येच्या रचनेवर लक्ष केंद्रित केले जाईल.
(नक्की वाचा- LPG Price Hike: महागाईचा भडका! LPG सिलिंडर दरात मोठी वाढ, चेक करा नवे दर)
'सेल्फ-एन्युमरेशन' म्हणजे काय?
नागरिकांना पहिल्यांदाच स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवण्याची संधी मिळत आहे. 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिक se.census.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. कुटुंबातील कोणताही सदस्य 15-20 मिनिटांत ही माहिती भरू शकतो. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. नोंदणी पूर्ण झाल्यावर मोबाईल किंवा ईमेलवर 'Self-Enumeration ID' मिळेल. जेव्हा जनगणना कर्मचारी तुमच्या घरी येतील (16 मे - 14 जून), तेव्हा त्यांना हा आयडी (SE ID) देणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुण्यात 'बंट्या' गोळ्यांचा मोठा साठा जप्त, 'फुलचंद पान' कनेक्शनमुळे खळबळ)
जनगणना अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, संकलित केलेली माहिती पूर्णपणे गोपनीय असून ती कोणत्याही पोलीस केसमध्ये किंवा आरटीआय (RTI) अंतर्गत वापरली जाऊ शकत नाही. तसेच, झोपडपट्टी भागातील घरांचाही या जनगणनेत समावेश करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.