महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजेच HSRP (High-Security Registration Plate) बसवण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर रोजी संपली असून, आता परिवहन विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरवले आहे.
राज्य परिवहन विभागाने वारंवार मुदतवाढ देऊनही अजूनही अनेक वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवण्यात आलेली नाही. 31 डिसेंबरची शेवटची संधी उलटून गेल्याने आता आरटीओ (RTO) प्रशासनाने रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पाच वेळा मिळाली मुदतवाढ
- पहिली मुदत: 31 मार्च 2025
- दुसरी मुदत: 30 जून 2025
- तिसरी मुदत: 15 ऑगस्ट 2025
- चौथी मुदत: 30 नोव्हेंबर 2025
- अंतिम मुदत: 31 डिसेंबर 2025
आता 2026 वर्षाची सुरुवात होताच, ज्या वाहनांवर नवीन नंबर प्लेट नसेल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
दंडाची रक्कम किती असेल?
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालकांना खालीलप्रमाणे दंड भरावा लागू शकतो. प्रथम उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम 1000 रुपयांपर्यंत असू शकते. तर दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास ही रक्कम 5000 ते 10000 रुपयांपर्यंत असू शकते.
कारवाई कशी टाळाल?
- राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत पोर्टलला (transport.maharashtra.gov.in) भेट द्या.
- तेथे तुमच्या वाहनाची माहिती भरून ऑनलाइन नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर मिळणारी ऑनलाइन पावती तुमच्याकडे जपून ठेवा.
- जर रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी तुम्हाला अडवले आणि तुमच्याकडे ही पावती असेल, तर तुमच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.
HSRP का आवश्यक आहे?
1 एप्रिल 2029 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांना ही प्लेट अनिवार्य आहे. यामुळे वाहनांची चोरी रोखण्यास मदत होते आणि डिजिटल रेकॉर्डमुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे जाते. या प्लेट्स टेम्पर-प्रूफ असून त्या सहजासहजी बदलता येत नाहीत.