- पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वादळी पाऊस
- १९ एप्रिलपासून २२ एप्रिलपर्यंत घाट परिसर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात वादळी पावसाचा अंदाज
- वादळी पावसासोबत विजांचा कडकडाट, गारपीट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता
सध्या उन्हाचे चटकेच सर्वांनाच लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. त्यातू दिलासा कधी मिळणार याचाची सर्वच जण वाट पाहात होते. त्यात आता हवामान विभागाने एक अंदाज वर्तवला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागाची उन्हाच्या चटक्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. मात्र 22 तारखेला वादळी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होईल.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये असे ही आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचा पारा वाढत आहे. मे महिना अजून यायचा आहे. त्यामुळे उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी काही भागात पाऊस होणार असल्याने काही वेळासाठी का होईना दिलासा मिळणार आहे. मात्र त्याचा फटका शेतकऱ्यांना ही बसू शकतो. त्यामुळे आतापासूनच खबरदारी घ्यावी अशा सुचना करण्यात आल्या आहेत. हवामानाचा गेल्या काही वर्षापासून अंदाज चुकत आहे. निसर्ग आपला रंग दाखवत आहे. हिवाळ्यात पाऊस, उन्हाळ्यात हिवाळा आणि हिवाळ्यात पाऊस असे प्रकार गेल्या काही काळात पाहायला मिळत आहे.