Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराला जागा देण्याच्या निर्णयामागे नक्की कोणते राजकारण होते, याबाबतची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला आणि काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात बोलत होते, असा दावा चव्हाण यांनी केला होता.
या राजकीय वादात आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी थेट उडी घेतली असून सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपाला शिंगावर घेतले आहे. मंदिराच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण बंद करा, असे सुनावत त्यांनी उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करण्याचे थेट आव्हान दिले आहे. या संपूर्ण वादामुळे भाजपामधील एका बड्या नेत्याकडे संशयाची सुई जात असून डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : मलंगगड मुक्तीचा सर्वात मोठा आवाज; 'या' एका निर्णयाने सुटणार वर्षानुवर्षांचा प्रलंबित प्रश्न! )
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयानंतर 8 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी थेट बॉम्ब टाकला. या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला, काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात सातत्याने बोलत होते, असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर केला.
उदय सामंत यांचा सावध बचाव
चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पडद्यामागे नक्की काय सुरू आहे, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. हा वाद वाढू लागल्याने स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तो संबंधित व्यक्ती कोण आहे, याची पूर्ण माहिती रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे आणि महायुतीतील इतर नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात संभ्रम पसरवणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी त्या नेत्याचे नाव थेट जाहीर करण्याचे टाळले. यामुळे तो अदृश्य नेता कोण, याबद्दलची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.
( नक्की वाचा : KDMC News: 'तुला जे करायचं ते कर'; केडीएमसी अधिकाऱ्याला कंत्राटदाराने भर सभेत सुनावले! महापालिकेत काय घडतंय? )
राजू पाटील यांची वादात उडी
हाच धागा पकडत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या वादात थेट उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोटो पोस्ट करत भाजपाला थेट शिंगावर घेतले आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या नावाने सुरू असलेले हे घाणेरडे राजकारण तात्काळ बंद झाले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. आमचे पिंपळेश्वर देवस्थान अत्यंत जागृत असून खोटे बोलणाऱ्यांचा देव नक्कीच आवाज बंद करेल, असा टोला त्यांनी लगावला.
उगीचच हवेत संशयाच्या पुड्या सोडण्यापेक्षा, मंदिराला जागा मिळू नये म्हणून उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करा, अशी ठाम मागणी राजू पाटील यांनी केली आहे.
'त्या' बड्या नेत्याकडे संशयाची सुई
राजू पाटील यांच्या या आक्रमक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा या मंदिराच्या जागेसाठी सुरुवातीचा संघर्ष सुरू होता, तेव्हा एक अतिशय वजनदार नेते काँग्रेस पक्षात मोठे मंत्री होते. हेच नेते आता सध्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे आणि उदय सामंत यांचे राजकीय संबंध सर्वश्रुत असल्याने, पडद्यामागून हालचाली करणारे हेच ते नेते आहेत का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या एका विधानामुळे आता डोंबिवलीचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.