Kalyan MNS News Today : कल्याण पश्चिमेतील मल्हार नगर आणि जोशी बाग परिसरातील नाले कचरा आणि गाळाने पूर्णपणे भरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.वारंवार तक्रारी करूनही कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही, असा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखं आंदोलन करत थेट नाल्यात उतरून क्रिकेट खेळत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक,कचरा आणि साचलेला गाळ असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पावसाळा तोंडावर आला असताना नालेसफाई न झाल्यास परिसरात पाणी साचून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो,अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
नक्की वाचा >> Ratnagiri News : रत्नागिरीत 'या' ठिकाणी CNG गॅसची टंचाई, वाहनांच्या लागल्यात लांबच लांब रांगा, चालक मेटाकुटीला
"लवकरात लवकर नालेसफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा"
मनसे पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की,अनेकदा केडीएमसीकडे लेखी आणि तोंडी तक्रारी करण्यात आल्या आहेत.पण प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने मनसेला अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. नाल्यात क्रिकेट खेळून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांनीही मनसेच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. लवकरात लवकर नालेसफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी मनसेकडून करण्यात येत असल्याची माहिती मनसे पदाधिकारी कपिल पवार यांनी दिली.