Monsoon in Maharashtra : मान्सूनची धमाकेदार एन्ट्री, कोकणात धडकला; तुमच्या जिल्ह्यात 'रिमझिम' कधी?

देशात मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला असून आता महाराष्ट्रातही मान्सूनची एन्ट्री झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Monsoon in Maharashtra : देशात मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला असून आता महाराष्ट्रातही मान्सूनची एन्ट्री झाली आहे. गोवा संपूर्णपणे मान्सूनच्या कवेत आल्यानंतर ६ जून रोजी कोकणातील किनारपट्टीवर मान्सून धडकला आहे. देवगडपर्यंत मान्सूनची रेषा पाहायला मिळत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणासह दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
हवामान विभागाकडून याबाबत माहिती मिळाली आहे. 

कसा असेल मान्सूनचा पुढील प्रवास? 


आज, ६ जून २०२६ रोजी नैऋत्य मान्सूनने अरबी समुद्राचा पश्चिम-मध्य व पूर्व-मध्य भाग आणि कर्नाटक, संपूर्ण गोवा, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशचे काही भाग, तामिळनाडू व नैऋत्य बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा पश्चिम-मध्य व ईशान्य भाग, संपूर्ण पूर्व-मध्य बंगालचा उपसागर आणि वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, तसेच मिझोराम व मणिपूर या भागांत आणखी प्रगती केली आहे. ६ जून रोजी मान्सूनची उत्तर सीमा (Northern Limit of Monsoon) देवगड, कोप्पळ, अनंतपुरमू, चेन्नई यांचा काही भाग आयझॉल पूर्व या ठिकाणांवरून जात आहे. पुढील २-३ दिवसांत नैऋत्य मान्सूनची मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे आणखी काही भाग, तेलंगणाचे काही भाग, तामिळनाडू व नैऋत्य बंगालच्या उपसागराचे उर्वरित भाग, बंगालच्या उपसागराचा पश्चिम-मध्य व उत्तर भाग आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील वाटचाल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

Advertisement

तुमच्या जिल्ह्यात कधी होणार मान्सूनची एन्ट्री?

६ जून, शनिवारी - मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, बीड, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

७ जून, रविवार - कोकण, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी ते हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.