Chhatrapati Sambhajinagar : पोळी नीट बनवता येत नसल्याच्या कारणावरून आईने 17 वर्षांच्या मुलीला चटके दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात समोर आली आहे. या प्रकरणी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तिच्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडित ही मूळ राजस्थान राज्यातील रहिवासी आहे. लॉकडाऊनच्या काळात हे कुटुंब संभाजीनगर शहरात स्थायिक झाले होते.
अधिक माहितीनुसार, संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरातील कमळापूर येथील एका अल्पवयीन मुलीने आपल्या आई-वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. आपल्याच आई-वडिलांकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपल्या आई-वडिलांसह राहत असताना तिला नियमित मारहाण केली जात होती. केवळ चपाती नीट तयार न केल्याने आईने चटके दिल्याचा आरोप या मुलीने केला आहे.
(नक्की वाचा- Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! 11 आरोपींविरोधात 1600 पानांचे चार्जशीट)
उपाशीपोटी गच्चीवर राहायची
या पीडित मुलीने पोलिसांसमोर आपली आपबीती सांगितली. या निर्दीय आई-वडिलांची कारनाम्यांची यादीच तिने आपल्या तक्रारीत नोंदवली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलीला अनेक वेळा बाथरूममध्ये अथवा घराच्या गच्चीवर राहण्यास भाग पाडले गेले. 1 जानेवारी 2020 ते 9 जानेवारी 2024 दरम्यान आपल्याला ही वागणूक दिल्याचं तिने तक्रारीत नमूद केले आहे. अनेकदा ती उपाशीपोटी झोपायची.
अखेर हिम्मत करत समोर आली
स्वतःच्या जन्मदात्यांकडून गेल्या चार वर्षांपासून सतत सुरू असलेल्या छळवणुकीला मुलगी कंटाळली होती. त्यामुळे अमानवी अत्याचार सहन करण्याच्या पलीकडे झाल्याने या मुलीने अखेर मौन सोडले आणि पोलिसांसमोर बोलती झाली. पोलिसांनी देखील तिला हिम्मत दिली. तिची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला.
(नक्की वाचा- Shirdi News: शिर्डीत भरदिवसा रस्त्यावरच सुरू आहेत नको ते धंदे, अनैतिक प्रवृत्तींचा शहराला विळखा?)
घरघरात मुलींचा छळ
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यादीप बालग्रह चर्चेत आहे. या बालगृहात देखील मुलींचा छळ सुरू होता. शेवटी यातील काही मुलींनी धाडस करत बालगृहातून पळ काढला. त्यानंतर त्यांनी बालगृहात होणारा छळ पोलिसांसमोर मांडला आणि या बालगृहाचा खरा चेहरा समोर आला. पण फक्त बालगृहातच नव्हे, तर अनेक घराघरात मुलींचा असा छळ होत असल्याचं वाळूजमधील घटनेमुळे समोर आले आहे.