अमोल सराफ, प्रतिनिधी
Khamgaon Water Issue : खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे नदी-नाले आणि शेतजमिनीतील गाळयुक्त पाणी थेट मुख्य धरणाच्या जलाशयात मिसळले आहे. यामुळे कच्च्या पाण्याचा गढूळपणा वाढला आहे. शहरात नळांद्वारे येणाऱ्या पाण्याचा रंग बदलल्याचे समोर आले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये म्हणून खामगाव नगर परिषदेने स्पष्ट केले आहे की, जलशुद्धीकरण केंद्रात कोअग्युलेशन (तुरटीचा वापर),फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन (गाळ खाली बसवणे),फिल्ट्रेशन आणि योग्य प्रमाणात क्लोरीनेशन करून पाणी निर्जंतुक केले जात आहे. पाण्यातील अवशिष्ट क्लोरीनचे प्रमाण योग्य राखले जात असून,जलगुणवत्तेची सातत्याने तपासणी सुरू आहे.त्यामुळे पाण्याचा रंग बदलला असला तरी ते पाणी असुरक्षित नाही.
पुढील 2 ते 3 दिवस सतर्क राहा
धरणातील गाळाचे प्रमाण प्रचंड असल्याने पुढील 2 ते 3 दिवस नळाला किंचित गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे.हा बदल केवळ मातीच्या अत्यंत सूक्ष्म कणांमुळे होत आहे.
नक्की वाचा >> Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध स्वीट्सच्या दुकानात काजू कतलीमध्ये भयंकर आढळलं; स्वयंपाकघराचं दृश्य पाहून...
नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली
पाणी उकळा: पिण्याचे पाणी किमान 10 ते 15 मिनिटे कडक उकळूनच वापरावे. पाणी काही वेळ भांड्यात स्थिर ठेवल्यास गाळ खाली बसेल.गढूळ वाटणारे पाणी स्वच्छ कापडाने किंवा चांगल्या गाळणीने गाळून घ्यावे.खामगाव नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.