Mumbai News Today : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या मनमानी कारभाराविरोधात अभिनव नगर येथील स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन केले. अनिता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या कामकाजाबाबत परिसरात मोठा असंतोष निर्माण झाला.त्यांच्या मनमानी कारभाराचा फटका स्थानिक रहिवासी आणि आदिवासी बांधवांना बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.अभिनव नगर या उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या जागेत वनसंरक्षकांच्या आदेशानुसार जवळपास 2250 चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात अनिता पाटील यांच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.
परिसरात तणाव निर्माण होऊन दगडफेकीची घटनाही घडली
माजी नगरसेवक राज सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी प्रशासनाचा निषेध केला. या परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबांकडे वास्तव्याचे सर्व पुरावे आणि कागदपत्रे असतानाही त्यांच्या घरांवर तोडक कारवाई करण्यात आली, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. या कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण होऊन दगडफेकीची घटनाही घडली होती.रहिवासीच नव्हे, तर राष्ट्रीय उद्यान परिसरात पर्यटकांना सेवा देऊन आपली उपजीविका करणाऱ्या स्थानिकांच्या वाहनांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
नक्की वाचा >> Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या सफाई कामगाराची ऑन ड्युटी हत्या, बायकोनंही जीवन संपवलं, कारण काय?
यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे,असा प्रश्न वाहनधारकांसमोर उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे अनिता पाटील यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या खात्यात आपली बदली करून घेतली. तर काहींनी नोकरीचा राजीनामा दिल्याचा दावाही केला. या सर्व गंभीर मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.