अमजद खान, प्रतिनिधी
Badlapur Local : बदलापूरकरांना रेल्वेच्या साडेसातीने अक्षरशः हैराण केले आहेत. आधीच अपुऱ्या रेल्वे फेऱ्या, रेल्वे स्थानकावर सुरु असलेले बांधकाम, याचा त्रास असताना, आता लोकल गळतीने ऐन गर्दीच्या प्रवासात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.बदलापूर स्थानकातून सीएसएमटी कडे सकाळी 10.42 ची एसी लोकल सुटल्यानंतर, 10.58 ची धीमी लोकल सुटते.
आधीच्या एसी लोकलचा महागडा प्रवास परवडणारा नसल्याने, 10.58 या लोकलला प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र याच लोकलच्या छपराला गळती लागली असल्याने, पावसाचे सगळे पाणी थेट डब्यात साचत होते. यामुळे ऐन गर्दीत लोकल मध्ये असूनही चिंब भिजून, आणि आसनांवर देखील पाणी पडल्याने, प्रवाशांचे मोठे हाल झाले. गर्दीच्या वेळेत पाण्यापासून बचावासाठी इंच भर सुद्धा हलता येत नसल्याने, अनेक प्रवासी त्याच पावसाच्या थेंबात भिजत उभे राहून प्रवास करत होते. त्यामुळे निदान आम्हाला चांगल्या दर्जाच्या लोकल तरी उपलब्ध करुन द्या अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत दमदार पाऊस
सकाळपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसाने काही भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील किंग सर्कल परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला उंच लाटा फेसाळताना पाहायला मिळत आहेत या लाटांचे चित्रीकरण करण्यासाठी मुंबईतील नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र सतर्कता बाळगण्याच्या आव्हानामुळे मोठा पोलीस फौज फाटा गेटवे ऑफ इंडिया ला तैनात करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. भिंत खचल्याने पार्किंगमधील अनेक वाहने दाबून मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांत भीतीचं वातावरण आहे.
( नक्की वाचा : Mumbai Lake Water Level : मुंबईत दमदार, धरण क्षेत्रात पातळ धार; धरणातील पाणीसाठा वाढण्याऐवजी घटला )
मुंबई आणि आसपासच्या परिसरात दमदार पाऊस होत असला तरी, पाणीपातळीत अपेक्षेप्रमाणे वाढ न झाल्यामुळे मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.