- मुहर्रमच्या भायखळ्यातील जूलुसमध्ये ३० हजार लोकांना ठार मारण्याचा कट फय्याज प्रेमजीने रचला होता
- फय्याजने झिंक फॉस्फाईड नावाचे धोकादायक रसायन वेदनाशामक व इम्युनिटी बुस्टर म्हणून वाटले होते
- त्याने मध्य प्रदेशातून ४० किलोहून अधिक झिंक फॉस्फाईड ऑनलाइन मागवले होते आणि १५ हजार लोकांना ठार मारायचे होते
मुहर्रमच्या भायखळ्यातील जूलुसमध्ये 30 हजार जणांचा बळी घेण्यासाठी निघालेल्या फय्याज प्रेमजीचा खरा चेहरा समोर आला आहे. त्याच्या चौकशीत काही धक्कादायक गोष्टी ही समजल्या आहेत. त्याला 30 हजार जणांना का मारयचं होतं हे ही आता स्पष्ट झालं आहे. त्यामागचं कारणं ऐकून मुंबई पोलीस ही हादरून गेले आहेत. फय्याजने चौकशीच स्पष्ट केलं की त्याने पुर्वी ख्वाजा शिया समाजाची निवडणूक लढवली होती. पण तो या निवडणुकीत हरला. त्यामुळे तो आपल्याच समाजातील लोकांवर नाराज होता. त्यामुळे त्याने या पराभवाचा बदला घेण्याचं ठरवलं. त्यातून हे कांड केल्याचं ही त्याने चौकशीत कबुल केल्याचं सुत्रांनी सांगितलं.
मुहर्रमच्या जूलुसमध्ये सहभागी झालेल्या लोकांना ठार मारण्याचा मोठा कट फय्याज प्रेमजीने रचला होता. पण एका महिलेच्या प्रसंगावधानामुळे हा डाव उधळला गेला. फय्याजने जूलुसमध्ये वेदनाशामक आणि इम्युनिटी बुस्टरच्या नावाखाली 'झिंक फॉस्फाईड' हे धोकादायक रसायन वाटलं होतं. उंदीर मारण्याचे विष म्हणून सामान्यतः वापरले जाणारे झिंक फॉस्फाईड त्याने मध्य प्रदेशातून ऑनलाइन मागवले होते. त्याने पुरवठादाराकडून 40 किलोहून अधिक झिंक फॉस्फाईड ऑनलाइन मागवले होते हे चौकशीत समोर आले आहे. त्याल कमीत कमी 15 हजार लोकांना ठार मारायचे होते. तसा प्लॅन त्याने आखला होता.
फय्याज प्रेमजी हा उच्च शिक्षित असल्याचं ही समोर आलं आहे. त्याने बीबीएचे शिक्षण पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या वडीलांची एक कंपनी आहे. त्याच कंपनीत तो काम करत होता. चौकशीत आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे तो पुण्याचा होतो. मात्र गेल्या काही वर्षापासून तो पत्नीपासून वेगळा राहात होता. तर त्याचे कुटुंबीय इराणमध्ये राहत असल्याचं समोर आलं आहे. त्याने इराण-इराकमध्ये ही काम केले आहे. पंधरा दिवसापूर्वीच तो मुंबईत हा कांड करण्यासाठी आला होता.
जूलुसमध्ये त्याने या विषारी कॅप्सूल वाटल्या होत्या. तर काही चॉकलेट म्हणूनही जूलुसमध्ये त्यांनी हे विष उडवले होते. काही जणांना या गोळ्या खावून त्रास झाला. त्यांना तातडीने वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिवाय फय्याज याला ही मुंबई पोलीसांनी अटक केली. अटकेनंतर चौकशीत निवडणुकीतील पराभव हे मुख्य कारण समोर आले. त्यातून नाराज झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. त्यात आणखी काही गोष्टी या मागे आहेत का ते ही तपासले जात आहे.