विशाल पाटील
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा दिवसेन दिवस गंभिर होत चालला आहे. भटके कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यात तर आता हे कुत्रे आक्रमक झाले आहेत. ते थेट नागरिकांवर हल्ला करत आहेत. त्यात आता पर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत. तर काहींना जीवही गमवावा लागला आहे. लहान मुलांवरही गेल्या काही दिवसात हल्ले झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात मुंबईत भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब होऊ लागली आहे. अनेक भटक्या कुत्र्यांनी मुंबईतील नागरिकांवरती हल्ले चढवले आहे. यामुळे मुंबईकर चिंतेत आहेत.
त्यात काही घटना समोर आल्या आहेत. दादरमध्ये तर एका भटक्या कुत्र्याने एक दोघांना नाही तर तब्बल 40 जणांचा चावा घेतला आहे. त्यामुळे दादरकरांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुंबई एक असे शहर आहे, ज्या शहरात नवीन नवीन समस्यांचा उगम होत असतोय. त्यात आता भटक्या कुत्र्यांचा विषय हा चिंतेची बाब ठरत आहे. कारण मुंबईतील अनेक नागरिकांवरती भटके कुत्रे हल्ले चढवत आहेत. यामध्ये खास करून शाळकरी मुलांवरती भटके कुत्रे हल्ले करत आहेत.दादर परिसरात पार्थना मोरे आणि आराध्य नाटेकर या शाळकरी विद्यार्थ्यांना भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागाला. त्यामुळे त्यांच्या भितीचे वातावरण आहे. बाहेर जावे की नाही असा प्रश्न या शाळकरी मुलां समोर आहे.
अशाच प्रकारे भटक्या कुत्र्यांशी सामना करताना जिलस डिसोझा यांना ही गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. या भटक्या कुत्र्यांवर लवकर उपाययोजना करावी अशी मागणी जिलसचा भाऊ एल्विस डोसोझा ने केली आहे. जर हे हल्ले असेच वाढत राहीले तर एक दिवस बाहेर पडावे की नाही याचा विचार करावा लागेल. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे तिथकेच गरजेचे होवून बसले आहे असं त्यांनी सांगितले. शिवाय स्थानिकांमध्ये ही याबाबत रोष निर्माण झाला आहे. यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलली पाहीजेत अशी ही मागणी होत आहे.
सध्या मुंबईत 69,000 पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. दरवर्षी मुंबई महानगरपालिका या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करत असते. मात्र दर पावसाळ्यात हा प्रश्न ऐरणीवर येत असतो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत महापालिका आता तरी कडक उपाययोजना करणारा का अशी विचारणा होत आहे. आता महापालिकेने या विषयाकडे आणखी गंभिरतेने पाहाणे गरजेचे आहे. या भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांची सुरक्षा मात्र धोक्यात आहे. मुंबई प्रमाणे हा प्रश्न राज्यातल्या अन्य शहरात ही उद्भवत आहे.