गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, भाजपच्या मंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात दिरंगाई झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. 'मास्टिक डांबर तंत्रज्ञानाचा' वापर करून तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
नक्की वाचा: गणेशोत्सवासाठी 380 विशेष फेऱ्या, 11 ऑगस्टपासून धावणार स्पेशल ट्रेन
खड्ड्यांच्या 8 हजार तक्रारी
शहराचे पालकमंत्री म्हणून आशिष शेलार यांनी विविध प्राधिकरणांच्या प्रमुखांसोबत एक तातडीची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी बीएमसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए आणि मुंबई पोर्ट ट्रस्टसह इतर सर्व संबंधित संस्थांना शहरातील प्रत्येक खड्डा भरण्याचे स्पष्ट निर्देश दिले. आतापर्यंत बीएमसीकडे खड्ड्यांच्या सुमारे 8,000 तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. ही संख्या मोठी असून, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
नक्की वाचा: खड्डे बुजवण्यासाठी अश्मयुगीन तंत्रज्ञानाचा वापर, लोकं म्हणतायत अरे ही तर थूकपट्टी!
मुंबईकर खड्ड्यांमुळे वैतागले
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जनतेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी युद्धपातळीवर काम करून सर्व रस्ते सुस्थितीत आणणे आवश्यक आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. यावेळी, त्यांनी वाकोला, विक्रोळी आणि गोरेगाव येथील उड्डाणपुलांवरील खड्डे तातडीने भरण्यास सांगितले, कारण त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अहवाल सादर करण्याचेही निर्देश
खड्डे बुजवण्याच्या या कामामध्ये जर एमएसआरडीसीने विलंब केला, तर बीएमसीने स्वतःच हे काम हाती घ्यावे, असे स्पष्ट निर्देशही शेलार यांनी दिले. हे काम योग्यरित्या पूर्ण झाल्यावर अहवाल सादर करण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बीएमसीने काम सुरू केल्याचे सांगितले. रस्ते दुरुस्तीसाठी 'मॅस्टिक डांबर तंत्रज्ञान' वापरण्याचा आग्रह धरण्यात आला आहे, कारण हे तंत्रज्ञान कमी वेळात आणि अधिक प्रभावीपणे काम करते असा दावा करण्यात आला आहे.