Mumbai Rain Update : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला सलग दोन दिवस पावसाने झोडपून टाकल्यानंतर मुंबईकरांना बुधवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. तुलनेने पावसांचा जोर कमी झाला आहे. मात्र हवामान विभागाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या इशाऱ्यामुळे मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली आहे.
मुंबईसह राज्यातील जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई शहर, पालघर, , मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान विभागाने ‘नाऊकास्ट' इशारा जारी केला असून याचा अर्थ पुढील काही तासांत या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचू शकते, वाहतूक कोंडी होऊ शकते आणि जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘रेड अलर्ट' म्हणजे काय?
‘रेड अलर्ट' हा हवामान विभागाने दिलेला सर्वाधिक पावसाचा इशारा आहे. याचा अर्थ, संबंधित भागात गंभीर हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, प्रशासनाने आणि नागरिकांनी तातडीने कार्यवाही करावी. यात अतिशय मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वीज कोसळण्याची शक्यता असते, ज्यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका असतो.