अमजद खान
Mumbai Train Accident : मुंब्रा इथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. विरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या इतक्या जवळ आल्या होत्या की दोन्ही ट्रेन एकमेकांना घासून गेल्या असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यातील एका ट्रेनमधील प्रवाशाच्या पाठीला असलेली बॅग अडकून ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सदर प्रकरणाची रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, चौकशीनंतर यातील तथ्य उजेडात येईल. या दुर्घटनेमध्ये ठाणे रेल्वे पोलिसात कार्यरत असलेल्या विकी मुख्यदल याचा मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार, वाढती गर्दी आणि लोकल ट्रेनचे बिघडलेले व्यवस्थापन यामुळे विकी यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब ही आहे की दोनच दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस होता.
विकी मुख्यदल आपल्या कुटुंबासह कल्याणच्या लोकग्राम परिसरात राहात होते. इथल्या सिंधू इमारतीतील रहिवाशांना विकी यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच जबर धक्का बसला आहे. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी विकी यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त विकी यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या, त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात त्यांच्या अपघाताची दुर्दैवी बातमी ऐकून शेजारच्यांना रडू कोसळले. विकी यांचे शेजारी संतोष आगवणे यांनी सांगितले की, '7 जून रोजी त्याxचा वाढदिवस होता. त्यांनी फोनच्या डीपीवर वाढदिवसाचा फोटो ठेवला होता. त्यावेळी त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या.'
नक्की वाचा : लोकल ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद झाल्यास काय होईल ?
17 तारखेला होता मुलाचा वाढदिवस
मुख्यदल कुटुंबासाठी जून महिना हा अत्यंत वाईट ठरला. 17 तारखेला विकी यांचा मुलगा प्रणय याचा वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवसाचे विकी आणि त्यांच्या पत्नीने सगळे प्लॅनिंग केले होते. मात्र वाढदिवसासाठी आयोजित केलेल्या सेलिब्रेशनचा मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याआधीच विकी यांनी जगाचा निरोप घेतला. विकी हे गेल्या चार वर्षापासून सिंधू इमारतीत राहत होते. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्याचे असून गावी आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. विकी यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी बुलडाण्यातील त्यांच्या गावी नेण्यात आले आहे. या दुर्घटनेत आम्ही एक चांगला शेजारी गमावला असे आगवणे यांनी म्हटले आहे. असे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी रेल्वेने गाड्यांची संख्या वाढविली पाहिजे. एसी लोकलप्रमाणे स्वयंचलित दरवाजे केल्यास अपघात कमी होतील असे त्यांचे म्हणणे आहे.