Mumbra Train Accident : मुंबईतील उपनगरीय रेल्वेतील वाढती गर्दी हा चिंतेचा विषय आहे. खासकरून मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर प्रवाशांचा वाढता ताण हा अधिकच चिंतेचा विषय बनलेला आहे. 9 जून रोजी म्हणजे सोमवारी मुंब्रा इथे लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. लोकलमध्ये खचाखच गर्दी असल्याने आणि आतमध्ये शिरता ने आल्याने अनेक प्रवासी नेहमीप्रमाणे दारात लटकून प्रवास करत होते. विरूद्ध दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी आणि मुंबईच्या दिशेने जात असलेल्या लोकलच्या दारात उभे असलेले प्रवासी धडकल्याने दोन्ही लोकलमधील प्रवासी पडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने एसी लोकल प्रमाणे सामान्य लोकल ट्रेनचे दरवाजेही स्वयंचालित पद्धतीने बंद होतील अशी यंत्रणा बसविण्यात येईल असे जाहीर केले आहे.
लोकलच्या डब्यात चेंगराचेंगरी, घुसमट होण्याची भीती
गर्दीच्या वेळी ज्याला पिक अवर म्हणतात त्यावेळी लोकल ट्रेनच्या डब्यात धड उभं राहणंही शक्य नसतं. आतमध्ये उभे राहता येत नाही म्हणून काहीजण नाईलाजास्तव दारात किंवा दाराजवळ उभे असतात. मात्र काहीजण हे लोकलच्या डब्यात जागा असतानाही उगाच स्टंट करण्यासाठी किंवा स्टाईल मारण्यासाठी दारात उभे असतात. डब्यात बसण्यासाठी काहीजणांच्या जागा जशा फिक्स असतात तशा काहीजणांचा दारात उभे राहण्याच्याही जागा फिक्स असतात. बाहेरच्या माणसाने दारात उभं राहण्याचा प्रयत्न केला तर त्याला दादागिरी करून आत ढकललं जातं किंवा त्याला चढूच दिलं जात नाही. गर्दीच्यावेळी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनचे दरवाजे बंद झाले तर डब्यामध्ये प्रचंड चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे. लोकल ट्रेनच्या डब्यामध्ये हवा खेळती राहावी यासाठी दरवाजा आणि खिडक्या सोडल्या तर फारशी प्रभावी यंत्रणा नसते. लोकलच्या डब्यातील पंखेही अनेकदा बंद असतात.अशावेळी असंख्य प्रवासी एकाचवेळी गुदमरू शकतात. महिलांच्या आणि दिव्यांगांच्या डब्यात ही परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा : 'पारसिक बोगद्याजवळील त्या खांबांनी जवळपास 1000 बळी घेतले असतील', जितेंद्र आव्हाडांची रेल्वेवर टीका
लोकं गुदमरून मरतील!
लोकल ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद होणारी यंत्रणा लागू झाली तर काय होईल असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले की, "लोकं आतमध्ये गुदमरून मरतील. किती गर्दी असते कल्पना आहे का तुम्हाला ?" राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे ट्रॅफीक आणि रेल्वेसेवेचा बोजवारा उडालेला आहे. लोकं लोकल ट्रेनच्या आत कशी शिरतात आणि कशी बाहेर येतात हे कळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत बोलताना म्हटले की, सगळ्या लोकलसाठी दरवाजे बंद करण्याची यंत्रणा लावणे अशक्य आहे. असं झाल्यास लोकं गुदमरतील. लोकांना श्वास घ्यायला हवा तर आली पाहीजे ना!
नक्की वाचा : 'किती मुंबईकरांचा जीव घेणार? तुमचे टार्गेट किती आहे?' प्रवासी संघटनेचा रेल्वे प्रशासनावर संताप
यंत्रणा तातडीने बसवली जाण्याची शक्यता कमी
निर्णय जाहीर होताक्षणी सगळ्या लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजांची यंत्रणा बसवली जाण्याची शक्यता ही फारच कमी आहे. सगळ्या लोकल गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी बरेच महिने लागण्याची शक्यता आहे. सगळ्या लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याला आतापासूनच विरोध होऊ लागला असून येत्या काळात तो तीव्र होण्याची शक्यता आहे.
दुर्घटना काय झाली?
9 जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अंदाजे 13 प्रवासी मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ लोकल ट्रेन मधून खाली पडले होते. यातील केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर), राहुल संतोष गुप्ता, विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी) आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला.