- नवी मुंबईतल्या कळंबोली पोलीस मुख्यालयातील उपहारगृह आणि वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे पोलीसांना अनेक समस्या
- पोलीस शिपायांच्या पगारातून शुल्क वसूल केले जात असले तरी गुणवत्ता नसलेले भोजन दिले जाते
- पाण्याच्या कुलरची साफसफाई होत नसल्याने अनेक शिपायांना पिण्याचे पाणी स्वतः विकत घ्यावे लागत आहे
राहुल कांबळे
पोलीस उपहारगृह आणि वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे नव्याने भरती झालेल्या पोलीस शिपायी हैराण झाले आहेत. नवी मुंबईतल्या पोलीस मुख्यालय कळंबोली येथील इथला हा प्रकार आहे. अशा स्थितीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. असा आरोप पोलीस वर्तुळातून केला जात आहे. सध्या जवळपास 150 ते 200 नव्याने भरती झालेले पोलीस शिपाई येथे राहण्यासाठी आहेत. त्यांच्यासाठी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतची व्यवस्था करण्यात आली आहे. पण इथं अस्वच्छतेचं साम्राज आहे असा आरोप होत आहे.
इथं राहणाऱ्या पोलिसांच्या पगारातून नियमानुसार शुल्क वसूल करण्यात येते. मात्र असं असलं तरी दर्जेदार भोजन दिले जात नसल्याची तक्रार आहे. जेवण तयार करण्याच्या ठिकाणी पुरेशी स्वच्छता नसून उंदरांचा वावर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे कुलर अस्वच्छ ठिकाणी बसविण्यात आले आहे. त्यांची नियमित साफसफाई होत नाही. अनेक शिपायांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा - CJP protest: 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक! 'हा' पक्ष आता मैदानात, केलं मोठं आवाहन
सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात उपहारगृह व वसतिगृहातील ओलावा, बुरशी आणि अस्वच्छ वातावरणामुळे अनेक प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी आजारी पडत आहे.. आसा दावा करण्यात आला आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना अस्वच्छ स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे वारंवार संसर्गाचा धोका निर्माण होत असल्याचेही आरोप आहेत. याकडे कोणी लक्ष देणार आहे का असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे. याशिवाय उपहारगृह आणि वसतिगृहातील काही भाग ओलसरपणामुळे खराब झाल्याचे तसेच इमारतीच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) विशाल ठाकूर आणि राखीव पोलीस निरीक्षक शांताराम वाघमोडे हे या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पोलीस वर्तुळातून करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राखीव पोलीस निरीक्षक शांताराम वाघमोडे हे नवी मुंबई येथे नियुक्ती होण्यापूर्वी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्त होते. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपून देखील त्यांची अद्याप बदली झालेली नाही.