Marathi Vs Hindi : हिंदी सक्तीचा वाद सुरू आहे असतानाच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीकडून नवीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. राज्यामध्ये हिंदी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या वतीने विविध पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारामध्ये आणखी एका पुरस्काराची भर पडणार आहे.
हिंदी सक्तीचा वाद सुरू असतानाच सरकारने महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी योजनांसाठी एकाच दिवसांत तीन जीआर काढले आहे. त्यात लाखो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Raj Thackeray: 'शाळा कशा हिंदी शिकवतात हेच बघू..', राज ठाकरेंचा सरकारला गर्भित इशारा)
"भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी साहित्य शिखर सम्मान" हा पुरस्कार सुरु करण्याचे शासन निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात हिंदी साहित्य क्षेत्रात प्रदीर्घ काळ मोलाचे योगदान देणाऱ्या व त्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या दरवर्षी एका मराठी भाषिक जेष्ठ हिंदी साहित्यिकाची "भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाषा शिखर सम्मान" या पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
सदर पुरस्काराचे स्वरुप तीन लाख रुपये, शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र असे असेल. आधीच इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय चर्चेत असतानाच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीकडून नवीन पुरस्काराची घोषणा झाल्याने नवीन वाद उभं राहण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Marathi Municipal School Closed : मराठी भाषा कशी वाचणार? गेल्या 13 वर्षात 131 मराठी शाळांना लागलं कुलूप)
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी 19 लाखाचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या "पुस्तक प्रकाशन अनुदान" योजनेंतर्गत 6 वेगवेगळ्या पुस्तकांच्या नावांना 1 लाख 15 हजाराचा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.