- पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले असून अनेक भागांत पुराचे पाणी घरात शिरले आहे
- पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती
- पालघरमध्ये मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
मनोज सातवी
मुंबईसह रायगड, पुणे, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. पण पालघरमध्ये ही पावसाने एकच धुकाकूळ घातला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांमध्ये ही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात भर म्हणून उद्या मंगळवारी ही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथल्या नागरिकांनी सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पण पावसाचा धुमाकूळ असाच सुरू राहील्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भीती ही व्यक्त केली जात आहे. पालघर रेल्वे स्टेशनला तर तलावाचे स्वरूप आले होते.
पालघरमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आहे. पालघरच्या पूर्व भागातील वीरेंद्र नगर, गोवारीपाडा येथे नाल्याला मोठा पुर आला होता. हे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात होते की पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांची एकच तारांबळ उडाली. पाणी घरात शिरल्याने अन्नधान्य, फर्निचर व इतर घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
त्यात एक लहान मुलाला त्याचे आई वडील सुरक्षित स्थळी हलवत असल्याचा फोटो ही समोर आला आहे. त्यांच्या घराच्या चारही बाजूने पाणी आलं होतं. सुरक्षित स्थळी जाण्या शिवाय पर्याय नव्हता. वेळीच दुसरीकडे गेलं नाही तर मोठा प्रसंग येवू शकतो. त्यामुळे त्या लेकाला आई वडीलांनी सुरक्षित स्थळी हलवलं. त्यांच्या ही घरात पाणी शिरले होते. बाळ सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी त्याच्या आई-वडीलांची धडपड दिसत होती. शेवटी त्यांनी त्याला कंबरभर पाण्यातून सुरक्षित ठिकाणी पोहोचवल. तो फोटो सध्या व्हायरल होत आहे. शहराच्या आंबेडकर चौक परिसरात सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती आहे. पालघर-सातपाटी मार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरातील इतर भागांतही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आज पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर ही शहराची स्थिती बिकट झाल्याचं दिसत आहे. सोमवारी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यात आता मंगळवारी मात्र रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या पेक्षा उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. दरम्यान साखरे-सफाळे मुख्य रस्त्यावर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक लाल रंगाची XUV कार पुराच्या पाण्यात अडकली. या कारमध्ये एक रुग्ण आणि अन्य दोन व्यक्ती प्रवास करत होत्या. घटनेची माहिती मिळताच साखरे गावातील स्थानिक नागरिक आणि नावझे गावातील तरुणांनी कोणतीही पर्वा न करता थेट पाण्यात उतरून कार सुरक्षितपणे बाहेर काढली. त्यानंतर कारमधील रुग्णाला तातडीने ॲम्ब्युलन्सद्वारे पर्यायी मार्गाने पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.