- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत
- मृतांच्या कुटुंबीयांनी बचाव कार्यात उशीर झाल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे
- अक्षय सावंत नावाचा एक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून त्याचे नुकतेच लग्न झाले होते
अजिंक्य धायगुडे पाटील
Moshi accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आज शनिवारी आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. या नंतर तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. बचाव कार्यात उशिर होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. अजून ही ढिगाऱ्या खाली सात जण अडकल्याचं सांगितलं जात आहे. तर 14 जणांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. पण आजचा दिवस सावंत कुटुंबीयांसाठी काळीज चिरणाराच ठरला आहे. या कुटुंबातील कर्ता मुलग्याचा या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. अक्षय सावंत असं त्याचं नाव आहे. ज्यावेळी ही बातमी त्याच्या कुटुंबीयांना समजली त्यावेळी त्यांच्यावर दुख: चा डोंगर कोसळला होता.
अक्षय सावंत हा मोशी कचरा डेपोत कामाला होता. त्याचं वय 33 वर्ष होतं. एक महिन्या पूर्वीच त्याला इथं नोकरी लागली होती. तर दोन महिन्या पूर्वीच त्याचं लग्न ही झालं होतं. नवीन नोकरी लागली होती. शिवाय लग्न ही झालं होतं. त्यामुळे सुखी संसाराची स्वप्न तो पाहत होता. पण नियतीला काही वेगळच मान्य होतं. 8 जुलैला अक्षय नेहमी प्रमाणे कामावर गेला होता. त्यावेळी साडे बारा वाजता त्याचं बोलणं त्याच्या पत्नी सोबत झाले. त्यावेळी त्याने पत्नीला आपण आता जेवायला जाणार असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर त्याच्या सोबत कोणताही संपर्क झाला नाही अस अक्षयची पत्नी सांगते. गेले दोन दिवस ती ही या ठिकाणी अक्षय सुखरूप बाहेर येईल याची वाट पाहात आहे.
अक्षयला वारंवार फोन केल्यानंतर त्याचा फोन बंद येत होता. मात्र लोकेशन मोशी कचरा डेपोचं दाखवलं जात होतं असं ही त्याच्या पत्नीने सांगितलं. त्यावेळी इमारत कोसळली होती. अक्षय ढिगाऱ्याखाली अडकला गेला होता. ही बातमी समजल्यानंतर अक्षयच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. गेले चार दिवस त्या तिथेच ठाण मांडूण आहेत. त्यांनी पाण्याचा एक थेंब ही गेल्या चार दिवसापासून घेतला नाही. माझा अक्षय सुखरूप बाहेर यावा असं ही त्यांनी बोलून दाखवलं. आई मुलासाठी व्याकुळ झाली होती. काही तरी होईल आणि तो बाहेर येईल अशी आशा त्यांना होती. त्या ज्यावेळी माध्यमांना हे सांगत होत्या त्याच वेळी अक्षय या जगातून निघून गेला होता. आता हे संपूर्ण सावंत कुटुंब पोरकं झालं आहे. त्यांच्यावर दुख: चा डोंगर कोसळला आहे.
एका आईने आपला लेक आणि एका पत्नीने अवघ्या दोन महिन्यात आपला पती गमावला आहे. त्यांचं दुख सांगता न येणारच आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. शिवाय कुटुंबातील एकाला संबंधीत कंपनीत नोकरी देण्यात येईल. शिवाय मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील कंपनी उचलणार आहे. हा अपघात म्हणजे अॅक्ट ऑफ गॉड असल्याचं कंपनीचे प्रेसिडेंट महेंद्र अनंतुला यांनी सांगितलं. या इमारती बाबत त्यांना विचारण्यात आलं त्यावेळी मात्र त्यांनी काही न बोलता निघून जाणं पसंत केलं.