ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर बंदी; दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
ठाणे:

ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केले आहेत. भुशी डॅम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून हे आदेश लागू करण्यात आलेत. या आदेशान्वये पर्यटकांना धबधबे, नदी, धरण परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशान्वये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, भोज, दहिवली, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदी, कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाट, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे,  हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे धरण, माळशेज घाट, नाणेघाट , गोरखगड, भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर, आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट आणि घाटातले धबधबे या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.

नक्की वाचा - धार्मिक कार्यक्रमांमधील निष्काळजीपणामुळे यापूर्वीही हजारो लोकांचा गेलाय बळी, जाणून घ्या कुठे-कुठे झाले होते अपघात

सीआरपीसी कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 34 अन्वये आदेश लागू करण्यात आले आहेत. मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातही बंदी
पुणे जिल्ह्यातील (Pune Picnic Spots) मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या आठ तालुक्यांतील गड-किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा पर्यटनस्थळी आता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या तालुक्यातील पर्यटनाच्या ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. धोकादायक पर्यटनामुळे अपघात होण्याच्या प्रकारांत वाढ होऊन त्यात काहींना जीव गमवावा लागण्याच्या घटना दरवर्षी घडतात. यंदाही पाऊस सुरू होताच दोन दिवसांत दोन दुर्दैवी घटना घडल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी जमावबंदीचे आदेश जारी केले. 

Advertisement