Indrayani Kundamala Bridge Collapse : मावळ तालुक्यातील कुंडमळा इथला पूल कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 51 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कुंडमळा इथला लोखंड पूल गंजला होता आणि तो कमकुवत झाला होता. 15 जून रोजी म्हणजेच रविवारी जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा या पुलावर मोठ्या संख्येने लोकं जमले होते. लोकांचा भार पुलाला सहन न झाल्याने तो कोसळला होता. इथे नवा आणि मजबूत पूल बांधण्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले होते, 11 जुलै 2024 रोजी या खर्चाला मंजुरी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या पुलाचे टेंडर निघाले होते. डिसेंबर 2024 मध्ये राज्यातील नवे सरकार स्थापन झाले. यानंतर या पुलाची वर्क ऑर्डर निघायला थेट 10 जून तारीख उजाडावी लागली. वर्क ऑर्डर निघाल्याच्या 5 दिवसानंतर ही दुर्घटना घडली.
नक्की वाचा : कुंडमळा येथील बचावकार्य थांबले, 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
अधिकारी “कशात” व्यस्त होते ?
या घटनेनंतर भ्रष्टाचार कसा चालतो, घोटाळेबाज घोटाळे कसे करतात याचे एक उदाहरण एका माजी अधिकाऱ्यानेच दिले आहे. PMRDA चे माजी आयुक्त, महेश झगडे यांनी X वर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोबद्दलची त्यांनी माहिती देताना म्हटले आहे की, "महानगर आयुक्त,पीएमआरडीए या पदावर असताना, 2016 मध्ये मी संपूर्ण 7400 चौ. कि.मी.चा परिसर सातत्याने फिरत असे. पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, 1987 साली प्रादेशिक नियोजन आराखड्यात रिंग रोडचे नियोजन करण्यात आले होते. पण माझ्यापूर्वीचे अधिकारी “कशात” तरी इतके व्यग्र होते की, 29 वर्षे तो रिंग रोड प्रत्यक्षात आणण्याची त्यांना फुरसतच मिळाली नाही."
हा पूल का बांधला ?
माजी सनदी अधिकारी झगडे यांनी पुढे लिहिले आहे की, "मी रिंग रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण 110 कि.मी.चा रस्ता स्वतः अधिकाऱ्यांच्या टीमसह कधी पायी, कधी वाहनाने प्रत्यक्ष फिरून पाहिला. अशाच एका पाहणी दौऱ्यात, देहूपुढे इंद्रायणी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक पूल बांधलेला दिसून आला. हा विनोद समजावा की देशाच्या प्रशासनाचे दुर्दैव म्हणावे हा पूल पूर्णपणे बांधलेला होता, पण दोन्ही बाजूंनी रस्ताच नव्हता! दोन्ही टोकांवर रस्ता नसतानाही हा पूल का बांधण्यात आला, याचे उत्तर मला मिळाले नाही.
ही तर प्रशासकीय विकृती!
झगडे यांनी कुंडमळा इथे घडलेल्या दुर्घटनेवर बोट ठेवत प्रश्न विचारला आहे की, जिथे पुलाची तातडीची गरज होती, तिथे निधी वापरण्यात आला असता, तर त्याचा निश्चितच जनतेला फायदा झाला असता. आता, इंद्रायणी नदीवरील कुंदमळा येथील पूल कोसळून जी जीवितहानी झाली, ती पाहता, अधिकाऱ्यांची कातडी किती बळकट झाली आहे, याची तीव्र जाणीव होते. ही भावना मी यापूर्वीही व्यक्त केली होती. अशा अधिकाऱ्यांनी तरी हा फोटो पाहून आपल्या बेफिकिरीची आणि प्रशासकीय विकृतीची जाणीव ठेवावी, ही किमान अपेक्षा!