- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव गाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली गेलं होतं, गावकरी विस्थापित झाले होते
- डिंभे धरणातील पाणीसाठा कमी होऊन दहा टक्क्यांवर आल्यामुळे गावाच्या खुणा पुन्हा दिसू लागल्या आहेत
- पाण्याखाली असतानाही गावातील प्राचीन जैन मंदिर आजही चांगल्या स्थितीत दिसत आहे
अविनाश पवार
एक असं गाव जे धरणाच्या पाण्याखाली गेलं होतं. तेच गाव जर अचानक पुन्हा वर आलं तर. तु्म्हाला विश्वास बसणार नाही. पण हो तसं झालंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याला नाव देणारे ऐतिहासिक आंबेगाव गाव आज डिंभे धरणाच्या पाण्याखाली आहे. धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर आल्याने आता या गावाच्या खुणा पुन्हा दिसू लागल्या आहेत. पाण्याच्या गर्भात लपलेले जैन मंदिर, जुन्या वस्तीचे अवशेष आणि बाजारपेठेच्या खुणा पाहून विस्थापित गावकऱ्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. मात्र या आठवणींसोबत विस्थापनाच्या जखमाही पुन्हा ताज्या होत असल्याचे चित्र आहे.
आंबेगाव तालुक्याचे नाव ज्या आंबेगाव गावावरून पडले, तेच गाव आज डिंभे धरणाच्या पाण्याखाली कायमचे विसावले आहे. मावळ खोऱ्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या या गावाचे धरण प्रकल्पासाठी विस्थापन करण्यात आले होते. सध्या डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तो अवघ्या दहा टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे धरणाच्या पोटात लपलेले जुने आंबेगाव पुन्हा एकदा दिसू लागले आहे. गावातील रस्ते, घरांचे अवशेष आणि इतर खुणा आता स्पष्टपणे नजरेस पडत आहेत. विशेष म्हणजे गावातील प्राचीन जैन मंदिर आजही सुस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
अनेक वर्षे पाण्याखाली राहूनही मंदिराची रचना टिकून असल्याने गावकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. मंदिराभोवतीचे अवशेष आणि जुन्या वस्तीच्या खुणा पाहताना अनेकांच्या डोळ्यांत आठवणी दाटून येत आहेत. एकेकाळी मावळ खोऱ्यातील व्यापारी केंद्र असलेल्या या गावातून परिसरातील अनेक गावांचा आर्थिक व्यवहार चालत असे. त्यामुळे या गावाशी अनेक कुटुंबांच्या भावना जोडलेल्या आहेत. धरणातील पाणी कमी झाल्याची माहिती मिळताच विस्थापित गावकरी आणि पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या जुन्या घरांच्या जागा शोधताना आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.
मात्र या भावनिक क्षणांबरोबरच विस्थापनानंतरचे विविध प्रलंबित प्रश्नही गावकरी मांडत आहेत. अनेक दशकांनंतरही काही प्रश्न मार्गी लागले नसल्याची खंत ते व्यक्त करत आहेत. डिंभे धरणाच्या पोटातून पुन्हा समोर आलेले हे जुने आंबेगाव एकीकडे इतिहासाची साक्ष देत आहे, तर दुसरीकडे विकासासाठी दिलेल्या त्यागाची आठवणही करून देत आहे. या गावाशी अनेकांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे गाव पाण्यावर आल्याचं ऐकताच अनेक जणांची पावलं आपोआप जुन्या आंबेगावाच्या दिशेने गेल्याचे पाहायला मिळालं. हा त्या गावकऱ्यांसाठी एक भावनिक क्षणच म्हणावा लागेल. धरणाचं पाणी कमी झाल्याने पुन्हा एकदा जुनं आंबेगाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या तिथे गर्दी पाहायला मिळत आहे.