अविनाश पवार
गेल्या तिन-चार दिवसात पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनाच सावधतेचा इशारा देण्यात आला होता. शाळ- कॉलेजना सुट्टी ही जाहीर करण्यात आली होती. शिवाय गरज नसेल तर घरा बाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणाता पाऊस झाला आहे. त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणचे पुल ही तुटले आहे. या घटनामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. यात सर्वाधिक फटका माळीण काळवाडीला बसला आहे. इथं सध्या भीतीचं वातावरण आहे.
माळीण, काळवाडी या भागात दरड कोसळली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण होते. अशा स्थितीत जवळपास 700 जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे अशी माहिती स्थानिक आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. शिवाय प्रशासनाला तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्याचे त्यांनी सांगितलं. या पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना मदत दिली जाईल. यासाठी आधी पंचनामे केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रशासना सोबतच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्राऊंडवर काम करत आहेत असं ही त्यांनी यानिमित्ताने सांगितले.
भिमाशंकर, माळीण, आहुपे, डिंभे आणि भीमाशंकर भागात विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. माळीण फाट्यावरही रस्ता बंद झाला आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने माळीण, काळवाडी आणि परिसरातील इतर धोकादायक भागांतून सुमारे 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. माजी मंत्री व स्थानिक आमदार दिलीप वळसे-पाटील स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या भागात पावसाळ्यात अनेक पर्यटक वर्षा पर्यटनाला येत असतात. पण पर्यटकांनी सध्या पुढील दोन दिवस तरी या भागात येवू नये असं आवाहन ही त्यांनी केलं आहे. प्रशासनाला सहकार्य करावं असं ही ते म्हणाले आहेत.
जुन्नार, आंबेगाव, मंचर, राजगुरूनगर या परिसरात तुफान पाऊस झाला आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी त्याची रिमझिम सुरू आहे. त्याच काळात मदत कार्य सुरू आहे. प्रशासन सतर्क आहे असं वळसे पाटील यांनी सांगितलं. लोकांना त्रास होवू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. अनेक ठिकाणचे रस्ते हे दरडी कोसळल्याने ब्लॉक झाल्याची माहिती ही त्यांनी दिला आहे. हे मार्ग मोकळे केले जात आहेत. कुणी ही या स्थितीला घाबरून जावू नये. प्रत्येक गोष्टीवर आपले लक्ष असल्याचं यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले आहे.