Pune News : वरंधा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ३१ ऑगस्टपर्यंत वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजेवाडी ते वरंधा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
पावसाळ्यात या घाटात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळतात. रस्ते खचण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
वरंधा घाटरस्ता ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे आदेश...
राष्ट्रीय महामार्ग 965 डीडी राजेवाडी ते वरंधा, भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट परिसरातील रस्त्यावर पावसाळयात अतिवृष्टीमुळे संभाव्य दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत घाटरस्ता बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत. पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव-निजामपुर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरुर-सातारा-कराड-कोल्हापूर किंवा राजवाडी पाटा-पोलादपूर-खेड-चिपळून पाटण-कराड-कोल्हापूर या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबाबतचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.