- मावळ तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे
- राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दरड कोसळून तो मार्ग तात्पुरता बंद झाला आहे
- किल्ल्यावर पंधरा ते वीस शालेय विद्यार्थी आणि काही पर्यटक अडकले होते
सूरज कसबे
पावसाचा जोर अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राजमाची किल्ले परिसरात ही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. याचा मोठा फटका किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला बसला आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे या मार्गावर अचानक एक मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे हा मार्ग बंद झाला. किल्ल्यावर जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्याने किल्ल्यावर गेलेले काही पर्यटक आणि विद्यार्थी त्यामुळे अडकून पडले होते.
किल्ल्यावर जवळपास 15 ते 20 शालेय विद्यार्थी आणि काही पर्यटक आले होते. पावसाळ्यात राजमाचीचं सौंदर्य विलोभनीय असतं. त्यामुळे पावसाळ्यात अनेक जण किल्ल्यावर येतात. पाऊस, धुक्यात हरवलेले डोंगर आणि हिरवागार परिसर यामुळे वातावरण हे अल्हादायक नक्कीच असते. याचा अनुभव प्रत्येकालाच घ्यावा वाटतो. त्यामुळे राजमाचीकडे अनेकांची पावलं आपोआप वळतात. पण पावसाळ्याच इथं येणं तेवढचं धोकादायक ही आहे. त्यामुळे इथं जाताना काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सततच्या पावसामुळे इथं दरड कोसळण्याची घटना घडली आहे.
दरड कोसळल्यामुळे किल्ल्यावरून खाली जाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे त्यावेळी किल्ल्यावर असलेले विद्यार्थी आणि पर्यटक तिथे काही काळ अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू केले. सुदैवाने, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सर्व विद्यार्थी आणि पर्यटकांची सुखरूप व सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. सध्या रस्त्यावरील माती आणि दगडांचा ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग पर्यटकांसाठी लवकरच पुन्हा खुला करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.