प्रसाद पाटील, प्रतनिधी
Raigad Latest News : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वहूर गावातील उगवती वाडीवरील महिला मंडळाने लग्न समारंभातील वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. लग्न कार्यात होणाऱ्या अनावश्यक खर्चिक प्रथा बंद करण्याचा निर्धार महिलांनी केला असून याबाबत गावात सर्वसंमतीने ठराव करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार लग्न समारंभात दिला जाणारा बस्ता (कापड आहेर),उटणे व हळदीच्या कार्यक्रमात मटण आणि दारू देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.या प्रथांमुळे लग्न समारंभाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो, तसेच काही वेळा वादाचे प्रसंग देखील उद्भवतात.त्यामुळे या खर्चिक आणि चुकीच्या प्रथा थांबवण्यासाठी महिला मंडळाने पुढाकार घेतला आहे.
लग्न समारंभ आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक
गावात अनेक वर्षांपासून लग्नात पाहुणे व नातेवाईकांना साड्या आणि कापड देण्याची प्रथा आहे.या बस्त्यासाठी यजमान कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो.त्याचबरोबर उटणे आणि हळदीच्या कार्यक्रमात चिकन-मटण तसेच दारू देण्याची प्रथा देखील रूढ झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे लग्न समारंभ आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक होत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.
नक्की वाचा >> अंबरनाथमध्ये तुफान राडा! शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर, रहिवाशांकडून दगडफेक अन् रास्ता रोको, कारण काय?
महिला मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या नियमांचे पालन न करणाऱ्या लग्न समारंभात महिला मंडळ कोणतीही मदत करणार नाही,असा स्पष्ट इशारा देखील देण्यात आला आहे. शिमग्याच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थ आणि चाकरमानी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महिला मंडळाच्या या पुढाकाराचे गावातील ग्रामस्थांनी स्वागत केले असून,लग्न समारंभ साधे,खर्च कमी आणि वादमुक्त व्हावेत.या उद्देशाने घेतलेला हा निर्णय समाजासाठी आदर्श ठरेल,अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.