गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आज आणि उद्या विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तळकोकणासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईकरांना मात्र प्रतीक्षा
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र त्यांना पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात 21 जूननंतर जोरदार पावसाची शक्यता आहे. शहर परिसराबरोबरच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्राकडेही पाठ फिरवल्याच दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 21 जूननंतर मुंबई आणि ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी शहराला आजपासून नियमित पाणी पुरवठा केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या चांगला पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या शीळ धरणातील पाण्याची पातळी उंचावली आहे. त्यामुळे शहरवासियांना आजपासून नियमित पाणीपुरवठा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरवासियांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता नियमित पडणाऱ्या पावसामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात पावसाचे जोरदार आगमन झाले असून तेथील नदी नाले ओसंडून वाहत असताना वर्ध्यात मात्र अजूनही दमदार पावसाचे आगमन झाले नसल्याने येथील नदी व नाले अजूनही कोरडे ठाक पडले आहेत. वर्ध्यात दोन तीन ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली. मात्र दमदार पावसाची अजूनही शेतकरी व सामान्य नागरिक वाट पाहत आहेत. नाशिकच्या कळवण तालुक्यातील आंबुर्डी , चिंचोरे , जामशेतसह पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या, नाले ओसंडून वाहू लागले. संपूर्ण परिसर जलमय झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. हा पाऊस खरीप हंगामाला पोषक असल्याने लवकर पेरणीला सुरूवात केली जाईल.
नक्की वाचा - नालासोपाऱ्यात खाणीतील तलावात 2 मुले बुडाली; तीन जण बेपत्ता
नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी झाली. वादळ वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेती पिकांना चांगला फायदा होईल अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून त्याचप्रमाणे शहादा तालुक्यात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. यावर्षी तापमानाचा45 पारा अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. त्यामुळे नदी नाले आटले होते. यावेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला होता. परंतु सलग दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पाण्यामुळे पुन्हा जीवनदान मिळणार आहे.
वाशिमच्या मंगरूळपीर येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.कवठळ येथील पपईच्या बाग उद्ध्वस्त होत मोठं नुकसान झालं असून यात विनायक भगत यांच्या सहा एकर पपई मधील 50 टक्के पपई कोलमडली. विनायक देवराव भगत यांच्या शेतातील 400 पपईंची झाडं मोडून पडली आहेत. शेतकरी पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी करीत आहे.